Lakhimpur Kheri Case: लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याची पुन्हा तुरुंगात रवानगी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आत्मसमर्पण
Ashish Mishra (Photo Credit - Twitter)

केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचा मुलगा आणि लखीमपूर खेरी घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्रा उर्फ ​​सोनू याने अखेर न्यायालयात शरणागती पत्करली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राचा जामीन फेटाळला होता. तसेच, त्याला आठवडाभरात न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर आरोपी आशिष मिश्रा याने दंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. सोमवार ही न्यायालयाच्या अंतिम मुदतीची शेवटची तारीख होती, मात्र त्यापूर्वीच रविवारी आशिष मिश्रा यांनी न्यायालयात जाऊन आत्मसमर्पण केले. त्यानंतर आरोपीची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आली. लखीमपूर खेरीतील आरोपींनी आत्मसमर्पण केल्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापूर्वी असे बोलले जात होते की, आरोपी आशिष मिश्रा 25 एप्रिल रोजी न्यायालयात शरण येणार आहे.

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

लखीमपूर खेरी येथे चार शेतकर्‍यांना चिरडल्याचा आरोपी आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अटक करण्यात आली आहे. यानंतर एसआयटीने आशिषविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली, तसेच जामिनाला विरोध केला. मात्र चार महिने तुरुंगात राहिल्यानंतर आरोपी आशिष मिश्राला उच्च न्यायालयाकडून काही अटींसह जामीन मिळाला. (हे देखील वाचा: Hardik Patel: काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांचे भाजपबद्दल सूचक वक्तव्य)

लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन देण्यास मोठा विरोध झाला होता. त्यांचा जामीन तात्काळ रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली. यासोबतच उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. याप्रकरणी गंभीर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, उच्च न्यायालयाने जखमींची बाजू कशी पाहिली, याची आम्हाला चिंता आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. मात्र 18 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना आशिष मिश्रा यांचा जामीन फेटाळला आणि त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले.