India China Face-Off: भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम- पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi (Photo Credit: ANI)

पूर्व लडाखमध्ये गलवाण खोऱ्यात झालेला संघर्ष (India-China Clash) आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह आणि 15 राज्याचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित होते. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी शहीद झालेल्या भारतीय जवानांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली वाहली आहे. तसेच भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, अशी खात्री त्यांनी देशातील जनतेला करून दिली आहे. आमच्यासाठी देशाचे ऐक्य आणि सार्वभौमत्व सर्वात महत्वाचे आहे. भारताला शांतता हवी आहे. मात्र, जशास तसे उत्तर देण्यासही भारत सक्षम आहे, असा इशाराही त्यांनी चीनला दिला आहे.

सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. अजूनही चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. अजूनही चीनकडून कुरापती सुरुच आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चीनच्या हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद; राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून वाहली श्रद्धांजली

एएनआयचे ट्वीट-

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. येत्या 19 जून रोजी संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष बैठकीत सहभागी होतील. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन याविषयी माहिती दिली.