Maharashtra Assembly Elections 2019 Results: अभिजित बिचुकले यांना फक्त 150 मतं; LatestLY मराठी ला त्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत तर अभिजीत बिचुकले यांना फक्त 150 मते मिळाली आहेत.
आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे ते विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे. परंतु त्यातही मुंबईतील वरळी मतदारसंघ ठरला आहे चर्चेचा विषय. कारण वरळी विभागातून शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध बिग बॉस मराठी 2 फेम अभिजित बिचुकले यांची लढत होती.
परंतु सध्या समोर आलेल्या आकड्यांनुसार आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत तर अभिजीत बिचुकले यांना फक्त 150 मते मिळाली आहेत.
अपयश मिळूनही अभिजीत यांनी LatestLY मराठी ला Exclusive मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, "मी विजयी होईन अशीच अपेक्षा मला होती. परंतु मी त्या विभागात नवखा असल्याने मला जनतेने मत दिले नसावे. तसेच ठाकरे कुटुंबीयांची ताकद खूप मोठी आहे, त्यांच्यापुढे मी काहीच नाही. आता जनतेचा कौल त्यांच्याबाजूने येणार असेल तर मी तो बदलणारा कोण?"
वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचं नेमकं कारण सांगताना ते म्हणाले, "माझी आत्या वरळीत राहते म्हणून मी त्या विभागातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. बाकी काहीच कारण नव्हतं."
अभिजीत यांनी आदित्य ठाकरेंच्या आघाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "माझे त्यांच्याशी वैयक्तिक काहीच मतभेद नाहीत. ते जिंकले तर माझ्या त्यांना नक्कीच शुभेच्छा आहेत."
तसेच बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता या उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध निवडणूक रिंगणात होत्या. पण तिथल्या निकालाबद्दल त्यांना सध्या काहीच माहिती नसल्याचे अभिजीत यांनी सांगितले. ते म्हणाले, "मी सध्या शूटसाठी बाहेर आहे. मला अलंकृताचा निकाल अद्याप तरी माहित नाही. परंतु उदयनराजे पिछाडीवर आहेत हे मी ऐकलंय."
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2019 12:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

