Tezaab Remake: माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर; 'तेजाब' चित्रपटाचा होणार रिमेक, मुराद खेतानने विकत घेतले हक्क
Tezaab (Photo Credit Youtube)

बॉलिवूडमध्ये जुन्या हिट चित्रपटांचा रीमेक करण्याचा ट्रेंड आहे. बर्‍याच जुन्या हिट चित्रपटांचे रिमेक यशस्वीही झाले आहेत, तर काहींच्या रीमेकला पसंती मिळाली नाही. आता याच बाबत माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोघांचा एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट म्हणजे तेजाब (Tezaab). 1988 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता व आता या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या रिमेकची चर्चा होती मात्र अखेर या चित्रपटाचे हक्क विकले गेले आहेत. मुराद खेतानने या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत.

ब्लॉकबस्टर कबीर सिंगनंतर मुराद खेतानने अमिताभ बच्चन स्टारर नमक हलालचा रीमेक करण्याचे हक्क मिळविले आहेत. इतकेच नाही तर, आता त्याने माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या क्लासिक तेजाबचे अधिकृत रीमेक हक्कही विकत घेतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजाबच्या रिमेकचे हक्क विकत घेण्यासाठी दोन निर्मात्यांमध्ये स्पर्धा होती. मात्र मुराद यांनी जास्त किंमतीमध्ये ते विकत घेतले. सध्या ते भूल भुलैयाचा सिक्वेल आणि थडम या रिमेकवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यानंतर नमक हलाल व तेजाबची प्रक्रिया सुरु होईल. बॉलिवूड हंगामाने याबाबत वृत्त दिले आहे.

तेजाबच्या कथेचे सार तसेच ठेवून स्क्रिप्टचे आधुनिकीकरण करण्याची निर्मात्यांची योजना आहे. तेजाबच्या रिमेकमध्ये आताचे दोन कलाकार मुख्य भूमिका साकारतील. मात्र माधुरी आणि अनिलही परत येणार की नाही हे अजून कळू शकले नाही. दरम्यान, तेजाबच्या कथेबरोबरच यातील 'एक दो तीन, चार पांच छे सात...’ यांसारखी गाणीही प्रचंड गाजली होती. हा माधुरीचा पहिला सुपरहिट चित्रपट होता. यामुळे ती रातोरात स्टार बनली होती. (हेही वाचा: Well Done Baby Trailer: पुष्कर जोग व अमृता खानविलकर यांच्या 'वेल डन बेबी'चा ट्रेलर प्रदर्शित; खळखळून हसवत भावनिक करणारा प्रवास (Watch Video)

या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता - अनिल कपूर, सर्वोत्कृष्ट फिमेल प्लेबॅक गायक - अलका याग्निक – ‘एक दो तीन’, सर्वोत्कृष्ट नृत्य - सरोज खान – ‘एक दो तीन’, सर्वोत्कृष्ट संवाद - कमलेश पांडे असे पुरस्कार जिंकले होते.