
Maya Govind Passes Away: प्रख्यात कवयित्री आणि गीतकार माया गोविंद (Maya Govind) यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माया खूप दिवसांपासून आजारी होत्या. मेंदूतील रक्त गोठल्यामुळे त्यांना जानेवारीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या घरी आल्या होत्या. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गीतकार माया यांचा जन्म लखनौ येथे झाला. त्यांनी कथ्थकमध्ये प्रभुत्व मिळवले होते. याशिवाय त्या कविताही लिहायच्या.
माया गोविंद दीर्घकाळ आजारी होत्या. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा अजय गोविंद त्यांच्या तब्येतीची माहिती शेअर करत असे. एका वाहिनीशी बोलताना त्यांच्या मुलाने सांगितले की, त्यांच्या आईला आधी फुफ्फुसात संसर्ग झाला आणि नंतर मेंदूमध्ये रक्त गोठले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरी उपचार सुरू करण्यात आले. (हेही वाचा - Rashmika Mandanna New Movie: रश्मिका मंदानाच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच, हिजाबमध्ये दिसुन आली रश्मिका)
लखनौमध्ये 17 जानेवारी 1940 रोजी जन्मलेल्या माया गोविंद या कथ्थकमध्ये निपुण होत्या. त्यांनी एक अभिनेत्री म्हणून पडद्यावर आणि रंगमंचावर स्वतःचे नाव कमावले आणि अनेक पुरस्कारही जिंकले. प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांचे नृत्य 'मीरा' त्यांनी लिहिले आहे. माया गोविंद यांनी पदवीनंतर बीएड केले. कुटुंबाची इच्छा होती की त्यांनी शिक्षक व्हावे. पण त्यांची आवड अभिनय आणि रंगभूमीमध्ये जास्त होती. शंभू महाराजांच्या शिष्या असलेल्या मायाने कथ्थकचा भरपूर सराव केला.
लखनौच्या भातखंडे संगीत विद्यापीठातून त्यांनी गायनाचा चार वर्षांचा अभ्यासक्रमही केला. त्या ऑल इंडिया रेडिओची श्रेणी A कलाकार होत्या. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्य स्पर्धेतही त्या पहिल्या आल्या होत्या. याशिवाय त्यांनी तोहफा मोहब्बत का या चित्रपटातही त्यांनी काम केले होते.
350 चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी
माया गोविंद यांनी सुमारे 350 चित्रपटांसाठी गाणी लिहिली. गीतकार म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 'रझिया सुलतान', 'बाल ब्रह्मचारी', 'आर या पार', 'गर्व', 'लाल बादशाह', 'याराना' अशा सर्व हिट चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.