Sagar Rana Murder Case: फरार कुस्तीपटू Sushil Kumar च्या अडचणीत वाढ; सागर राणा हत्येप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी
(सुशील कुमार) Photo Credits: Instagram

ज्युनिअर पैलवान सागर राणा (Sagar Rana) याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) व इतरांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 23 वर्षीय कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार हा आरोपी आहे. या खून प्रकरणात सुशीलचे नाव समोर आल्यापासून तो फरार आहे. दिल्लीच्या कोर्टाने शनिवारी सुशीलविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. यापूर्वी त्याच्या विरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारच्या घरावर छापा टाकला होता परंतु तो सापडला नाही.

या संपूर्ण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसह इतर दोन कुस्तीपटूंच्या घरावर छापा टाकला. नंतर ही माहिती समोर आली की, सुशील दिल्लीहून प्रथम हरिद्वारला गेला होता आणि त्यानंतर ऋषिकेशमधील आश्रमात काही दिवस राहिला होता. आता असेही मानले जात आहे की, सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिस बक्षिस जाहीर करू शकतात. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा सुशीलला नोटीस पाठवली गेली तेव्हा त्याने आपला फोनही बंद केला होता.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणानंतर पोलिसांच्या चौकशीत सुशील मदत करेल अशी पोलिसांना अशा होती. जर हे घडले असते तर कदाचित सुशीलच्या अडचणी कमी झाल्या असत्या, पण सुशीलने पळून जाऊन आपल्या समस्यांमध्ये अजून वाढ केली आहे.

दरम्यान, 4 मे रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंमध्ये भांडणाची बातमी दिल्ली पोलिसांना मिळाली. भांडणात जखमी झालेला कुस्तीपटू सागरला बीजीआरएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याचे पाहून त्याला ट्रॉमा सेन्टल येथे नेण्यात आले. स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सुशील कुमार, अजय, प्रिन्स, सोनू, सागर, अमित आणि इतरांमध्ये वाद झाल्याचे पोलिसांना आढळले. (हेही वाचा: भुवनेश्वर कुमार लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार? महत्वाची माहिती आली समोर)

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्ली सरकारला पत्र लिहून सुशील खून आणि खंडणी प्रकरणात फरार असल्याचे त्यांना कळवले होते. सुशील दिल्ली सरकार अंतर्गत येणाऱ्या छत्रसाल स्टेडियमचा उपसंचालक आहे. दुसरीकडे, सुशीलच्या जवळचे लोक असे म्हणतात की, या प्रकरणामध्ये सुशीलला जाणीवपूर्वक फसवले जात आहे. सुशीलचा दोष फक्त इतकाच आहे की हल्ला करणारे लोक सुशीलचे साथीदार पैलवान आहेत.