T20 World Cup 2021: पाकिस्तान कर्णधार बाबर आजमचा दावा, म्हणाला- ‘टीम इंडियावर आमच्यापेक्षा जास्त दबाव’, कारणही केले स्पष्ट
विराट कोहली आणि बाबर आजम (Photo Credit: Getty)

T20 World Cup 2021: इंग्लंडमध्ये 2019  विश्वचषक स्पर्धेनंतर भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आले आहे आणि या दोन संघांमधील सामना 24 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. वर्ल्ड कप सापरधेत पाकिस्तान अद्यापही भारताला हरवू शकला नाही, पण असे असूनही, 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या टी-20 विश्वचषक सामन्यात भारतावर अधिक दबाव असेल, असा दावा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) केला आहे. भारत-पाकिस्तान देशातील राजकीय संबंध बऱ्याच काळापासून खराब होत आहेत आणि अशा स्थितीत दोन्ही संघांमधील द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांना टक्कर देताना दिसतात. रमीज राजा (पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे पुढील अध्यक्ष) यांच्याशी झालेल्या भेटीनंतर बाबर म्हणाला, “मला वाटते की भारतीय संघ विश्वचषक सामन्यात आमच्यापेक्षा जास्त दबावाखाली असेल.” (T20 World Cup 2021 India Squad: भारताच्या टी-20 वर्ल्ड कप संघात कोणत्या खेळाडूंना मिळणार प्रवेश?)

‘भारताला पराभूत करून आम्ही आमची मोहीम सुरू करू इच्छितो’, असं तो म्हणाला. आयसीसीने जाहीर केलेल्या ड्रॉ नुसार दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड टी-20 कपच्या गट फेरीत भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. वर्ल्ड कप 2019 नंतर दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. इंग्लंडमध्ये आयोजित आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा सहज पराभव करत एकहाती वर्चस्व गाजवले होते. आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे आणि 50 ओव्हरच्या विश्वचषकात पाकिस्तानला अद्याप एकदाही भारताविरुद्ध विजयाची चव चाखू शकलेला नाही. बाबर म्हणाला की, संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळणे त्यांच्यासाठी घरी खेळण्यासारखे असेल. श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानचा दौरा करणे टाळले होते.

बाबर म्हणाला, “हे अगदी आमच्या घरच्या मैदानासारखे आहे, जेव्हा आम्ही यूएईच्या मैदानावर खेळतो, तेव्हा आम्हाला एक फायदा मिळतो आणि त्यासोबत आमचे 100 टक्के देणे आवडते.” बाबरने असेही म्हटले आहे की, तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे कर्णधार बनल्याचा त्याच्यावर कोणताही दबाव नाही. दुसरीकडे, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण पाच सामने खेळले गेले, त्यापैकी भारताने चार सामने जिंकले, तर एक सामना बरोबरीत सुटला. टाय सामन्यात भारताने पाकिस्तानला बॉल-आउटमध्ये पराभूत केले होते.