IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील दोषी क्रिकेटर श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; आजीवन बंदीबद्दल पुर्नविचार करण्याचा BCCI ला आदेश
Filer Photo of Former Indian speedster Sreesanth (Photo Credits: Facebook)

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी (Spot fixing case) दोषी आढळल्याने क्रिकेटर श्रीसंतवर (Sreesanth) आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने श्रीसंतला दिलासा दिला आहे. BCCI ने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन 3 महिन्याच्या आत बंदीचा पुनर्विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदीची याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायलयाने गुरुवारी आपला निर्णय दिला. या याचिकेत बीसीसीआयने श्रीसंतवर आयपीएल-2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरवत त्याच्या क्रिकेट खेळण्यावर आजीवन बंदी घातली होती. बीसीसीआयने न्यायालयात श्रीसंतवर भ्रष्टाचार, सट्टेबाजी आणि खेळाचा अनादर केल्याचे आरोप केले होते.

सुनावणी नंतर कोर्टाने श्रीसंत आणि बीसीसीआय दोघांनाही दोन आठवड्यांच्या आत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायलयात बीसीसीआयची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील पराग त्रिपाठी यांनी सांगितले की, "खेळात भ्रष्टाचार आणि सट्टेबाजी केल्याप्रकरणी श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात येत आहे." यावर श्रीसंतचे वकील सलमान खुर्शीद 10 लाख रुपये मॅच फिक्सिंगशी संबंधित असल्याचे बीसीसीआयने सिद्ध करावे, अशी मागणी केली. तसंच या क्रिकेटरचे क्रिकेटची ओढ कायम असल्याने त्याचे करिअर वाया जाण्यापासून वाचवावे, असे न्यायलयात सांगितले. यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या दबावाखाली गुन्हाची कबुली दिल्याचे श्रीसंतने सांगितले होते.