ICC WTC फायनल सामन्यासाठी टीम इंडियाने कसली कंबर, व्हिडिओ पाहून किवी संघालाही फुटेल घाम (Watch Video)
शुभमन गिल आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter/BCCI)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) आणि इंग्लंड (England) विरोधात  पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Team) लवकरच इंग्लंडला रवाना होणार आहे. सध्या सर्व खेळाडू मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. यादरम्यान, बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंचा जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडूंनी आयसीसीच्या प्रतिष्ठित अंतिम सामन्यात कंबर कसलेली दिसत असून सर्व खेळाडू जिममध्ये घाम गाळत आहेत. टीम इंडिया (Team India) 2 जून रोजी चार्टर्ड विमानाने इंग्लंडला रवाना होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रिषभ पंत, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, इशांत शर्मा, उमेश यादव आणि मयंक अग्रवाल जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. (ICC WTC Combined Playing XI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-2021 आपल्या अंतिम टप्प्यात, पहा ICC कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेचा सर्वोत्तम संयुक्त प्लेइंग XI)

कर्णधार विराट कोहलीसह मुंबईत राहणारे खेळाडू संघात सामील झाले आहेत, पण सध्या ते क्वारंटाईन असून हॉटेलच्या खोलीत त्याच्या वर्कआउट्सची व्यवस्था केली गेली आहे. इंग्लंड दौर्‍यावरील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिकादेखील खेळणार आहे. न्यूझीलंड संघ यापूर्वीच इंग्लंडमध्ये दाखल जाहला असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यापूर्वी ते यजमान इंग्लंड विरोधात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. दरम्यान, भारतीय संघ मुंबईत ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहे त्या हॉटेलमधील जिममध्येही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार जिममध्ये ठेवलेली सर्व उपकरणे वेळोवेळी स्वच्छ केली जात आहेत.

नुकतंच आयपीएलच्या बायो-बबलमध्ये काही खेळाडू आणि सहाय्य्क कर्मचारी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग  2021 स्थगित करावी लागली. अशा परिस्थितीत बीसीसीआय इंग्लंड दौर्‍यावर जाणाऱ्या खेळाडूंची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी सर्व प्रकारची सावधानी बाळगत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. इंग्लंड दौर्‍यावर भारत एकूण सहा कसोटी सामने खेळणार आहे. WTC फायनल सामन्यानंतर, भारत 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडचा सामना करेल.