वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघावर आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता; पाकिस्तानी मिडीयाचा दावा
Virat Kohli and teammates react after India won the third Test against Australia. (Photo: Getty Images)

भारताने जम्मू काश्मीर (Jammu kashmir) मधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा (Pakistan) जळफळाट झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये आतंकवादी हल्ला (Terror Attack) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट दिवशी भारतातील अनेक शहरे हाय अलर्टवर होती. आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सध्या वेस्ट इंडिजच्या (West Indies) दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला (Indian Cricket Team) लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार वेस्ट इंडिजमध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघावर हल्ला होण्याच्या शक्यतेविषयी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ला एक ईमेल प्राप्त झाला आहे. पीसीबीने ताबडतोब ही माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलला (ICC) दिली आहे. या इमेलनुसार भारतीय संघावर आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. कराची येथील पत्रकार तसेच स्पोर्ट्स रिपोर्टर फैजान लखानी (Faizan Lakhani) यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. (हेही वाचा: रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती)

मात्र सध्या तरी पीसीबी, आयसीसी किंवा बीसीसीआय (BCCI) कडून अद्याप या वृत्ताची कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही. दरम्यान, विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज विरुद्ध टी-20 पाठोपाठ वनडे मालिकादेखील भारताने जिंकली आहे. सध्या विंडीजविरुद्ध आगामी टेस्ट मालिकेसाठी भारतीय संघ तयारी करत आहे.