IND vs ENG 1st Test 2021: Rohit Sharma-KL Rahul यांच्या जोडीने केली ‘ती’ कमाल ज्याची फार कमी लोकांना होती अपेक्षा
केएल राहुल आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test 2021: नॉटिंगहम (Nottingham) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी आक्रमक कामगिरी करत टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या यजमान इंग्लंड (England) संघाला पहिल्या डावात फक्त 183 धावांवर गुंडाळले. भारताकडून (India) नियमित सलामीवीर मयंक अग्रवालच्या जागी पहिल्या सामन्यात रोहित शर्मा  (Rohit Sharma) याच्यासोबत केएल राहुल (KL Rahul) सलामीला उतरला आहे. या दोघांनी पहिल्याच सामन्यात अशी कमाल केली ज्याची कदाचितच क्रिकेटप्रेमींनी अपेक्षा केली असेल. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून दोघांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली आणि ब्रिटिश संघाचे अनुभवी घातक वेगवान गोलंदाज, जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) हल्ल्याचा धीराने सामना केला. राहुल आणि रोहितमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे. तसेच इंग्लंड गोलंदाज अद्यापही विकेटच्या शोधात आहेत. (IND vs ENG 1st Test: विराट कोहलीने जोस बटलरच्या बाद होण्याची भविष्यवाणी, मग जे झाले ते पाहून सर्वांनाच बसला धक्का Watch Video)

कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी क्रिकेट तज्ज्ञांचा असा अंदाज होता की इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना खेळणे भारतीय संघासाठी खूप आव्हानात्मक असेल. विशेषतः जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना. या दोन्ही गोलंदाजांनी इंग्लंडसाठी लाल बॉल क्रिकेटमध्ये 1140 विकेट्स घेतल्या आहेत. पण भारतीय सलामी जोडीचे कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी न केवळ या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी केली, तर संघाला चांगली सुरुवातही करून दिली. यापूर्वी जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात रोहित व शुभमन गिल यांची सलामी जोडी अपयशी ठरली होती. दोघांनी चांगली सुरुवात करूनही न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक सामन्यात दोघे संघाला मोठी सुरुवात मिळवून देऊ शकले नाही. किवी संघाविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय सलामी जोडीचे अपयश विराटसेनेच्या पराभवाच्या मुख्य कारणांपैकी एक होते. त्यामुळे आता राहुल-रोहित इंग्लंडविरुद्ध त्या चुकीची पुनरावृत्ती न करण्याच्या विचारात असतील.

दरम्यान, नॉटिंघमच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय गोलंदाजानी पहिल्या दिवशी भेदक गोलंदाजी करत ब्रिटिश संघाचा डाव अवघ्या 183 धावांवर गुंडाळला. पाहुण्या संघासाठी जसप्रीत बुमराहने 4 आणि मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दूल ठाकूरने 2 व मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.