IND vs BAN 3rd T20I: दीपक चाहर याने हॅटट्रिकसह नोंदवला विश्वविक्रम, बांग्लादेशविरुद्ध मॅचमध्ये बनले 'हे' प्रमुख रेकॉर्ड
टीम इंडिया (Photo Credits: IANS)

नागपूर येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात भारताने (India) बांग्लादेश (Bangladesh) ला 30 धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली. टॉस गमावून पहिले फलदांजीसाठी आलेल्या भारताने निर्धारित ओव्हरमध्ये 4 बाद 174 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ 144 धावांवर ऑल आऊट झाला. दीपक चाहर (Deepak Chahar) याने या सामन्यात टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पहिली हॅटट्रिक घेतली. चहरने या हॅटट्रिकसह विश्वविक्रमाचीही नोंद केली आणि यासाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित केले. दीपकने हॅटट्रिकसह एकूण सहा विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. या सामन्यात त्याने सात धावा देऊन सहा गडी बाद केले. निर्णायक सामन्याच्या एका टप्प्यावर मोहम्मद नईम (Mohammad Naim) आणि मोहम्मद मिथुन (Mohammad Mithun) यांनी तिसर्‍या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करत टीम इंडियाच्या चिंता वाढवल्या होत्या. पण, चहर आणि शिवम दुबे (Shivam Dube) याने विकेट घेत संघाला चांगले पुनरागमन करून दिले आणि आणि बांग्लादेशला 19.2 षटकांत 144 धावांवर ऑल आऊट केले. (IND vs BAN 3rd T20I: युजवेंद्र चहल याने घेतल्या सर्वात जलद 50 टी-20 विकेट; आर अश्विन, जसप्रीत बुमराह यांना टाकले मागे)

तिसर्‍या सामन्यात बनवलेल्या या मुख्य रेकॉर्डवर नजर टाकूयाः

1. भारताकडूनआंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात हॅटट्रिक करणारा दीपक पहिला गोलंदाज, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये हॅटट्रिक घेणारा 11 वा गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने सर्व प्रथम टी-20 मध्ये हॅट्ट्रिक घेतली होती, तर श्रीलंकेचा लसिथ मलिंगा याने दोन वेळा हॅटट्रिक नोंदविली आहे.

2. दीपक चहरने अवघ्या 7 धावा देऊन 6 विकेट घेत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. चहरने श्रीलंकेचा अजंथा मेंडिस याचा विक्रम मोडला. मेंडिसने 8 धावांवर 6 विकेट घेण्याच्या विक्रमाची यापूर्वी नोंद केली होती.

3. युजवेंद्र चहल यानेआंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 50 विकेट पूर्ण केल्या. अवघ्या 34 सामन्यासह हा विक्रम गाठणारा चहल सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज ठरला. जसप्रीत बुमराह (Jasprit Burmah) ने भारताकडून 41 सामन्यांत आणि आर अश्विन (R Ashwin) ने 42 सामन्यात हा पराक्रम केला होता.

4. तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभवानंतर भारताने चौथ्यांदा मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर होता, पण जखमी लायन्सने पुढचे दोन सामने जिंकत जोरदार पुनरागमन केले. यापूर्वी भारताने 2016 मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे आणि 2017 मध्ये इंग्लंडचा पराभव केला होता.

5. 11 व्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने बांग्लादेशविरुद्ध10 व्या विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे, बांग्लादेशने यंदाच्या मालिकेदरम्यान पहिल्यांदा टीम इंडियाविरुद्ध विजयाची नोंद केली होती. बांग्लादेशने दिल्लीतील सामना 7 विकेटने जिंकत पहिला विजय मिळवला होता.

मागील दोन सामन्यात संघाने बॅटिंग आणि बॉलिंगने शानदार प्रदर्शन केले. तिसर्‍या टी-20 मध्ये गोलंदाजांनी भारताला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. दीपक टीमसाठी मॅच विनर सिद्ध झाला. दुसरीकडे, दोन्ही संघात 14 नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाईल. यातील दुसरा सामना हा 'डे-नाईट' असणार आहे. भारत-बांग्लादेशमधील दुसरा टेस्ट 22-26 नोव्हेंबरमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.