IND vs AUS 2nd Test: ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट मॅचमध्ये भारतासाठी ‘हा’ खेळाडू ठरू शकतो मोठा ‘गेमचेंजर’, तर पृथ्वी शॉ याचा पत्ता कट होण्याची शक्यता
टीम इंडिया (Photo Credit: IANS)

IND vs AUS 2nd Test 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) अ‍ॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) मधील पहिल्या पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्यात भारताला (India) पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना खेळला जाणार आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा डाव 36 धावांवरच संपुष्टात आणला. एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही आणि स्वस्तात माघारी परतले. अशा स्थितीत मेलबर्न टेस्टपूर्वी टीम इंडियाला त्यांच्या खेळात सुधार करण्याची गरज आहे. पहिल्या सामन्यातील भारताच्या प्लेइंग इलेव्हनने सर्वांचे लक्ष वेधले होते. शुभमन गिलच्या जागी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि रिषभ पंतच्या जागी रिद्धिमान साहाचा भारताने समावेश केला होता, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया आता काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. शिवाय, कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्याने त्याच्याजागी कोणाला संधी मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असेल. (ICC World Test Championship Points Table: ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा दारुण पराभव, जाणून घ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलची सध्या स्थिती)

पहिल्या पिंक-बॉल टेस्टच्या दोन्ही डावात भारताचा युवा सलामी फलंदाज पृथ्वी फ्लॉप ठरला त्यामुळे आगामी दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याचा पत्ता कट होण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याच्या जागी शुभमन गिलला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. शिवाय, रवींद्र जडेजाला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. पहिल्या टी-20 सामन्यात जडेजाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यात स्थान दिले नव्हते. मात्र, आता तो फीट आहे आणि दुसर्‍या सामन्यासाठी तो उपलब्ध असून भारतासाठी गेमचेंजर सिद्ध होऊ शकतो. तो खालच्या क्रमांकावर फलंदाजी व्यतिरिक्त चेंडूने देखील संघासाठी मोठे योगदान देऊ शकतो,  त्यामुळे पुढच्या सामन्यात संघ हनुमा विहारीच्या जागी त्याच्या नावाचा विचार करू शकतो.

दुसरीकडे, विराट कोहली आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मानिमित्त मायदेशी परतला असल्याने त्याच्या जागी संघ केएल राहुलचा समावेश करून मधल्या फळीत रिद्धिमान साहाच्या ऐवजी रिषभ पंतला टीम इंडिया संधी देऊ शकते. तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला असल्याने संघाला नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांच्यातून निवड करावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात लज्जास्पद पराभवानंतर भारतीय संघापुढे आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान आहे.