ICC WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यानंतर या 3 भारतीय खेळाडूंच्या कसोटी क्रिकेट करिअरवर लागू शकतो ब्रेक
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

ICC WTC Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) फायनल सामन्यात भारतीय संघाची (Indian Team) गाठ न्यूझीलंडशी (New Zealand) आहे. या स्पर्धेदरम्यान अनेक द्विपक्षीय कसोटी सामन्यांनंतर भारत आणि न्यूझीलंड संघाने गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर ताबा मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. टीम इंडिया (Team India) बहुप्रतीक्षित सामन्यासाठी सज्ज असून बीसीसीआयने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी 20 खेळाडूंसह 4 स्टँडबाय खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. या स्पर्धेमध्ये कसोटी क्रिकेटला पहिला वर्ल्ड चॅम्पियन मिळणार आहे त्यामुळे, भारतीय खेळाडू सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यास उत्सुक असतील. कसोटी संघाचा नियमित भाग असणे थोडे कठीण काम आहे कारण खेळाडूंना आपण कसोटी तज्ञ असल्याचे सिद्ध करावे लागते. टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर (World Test Championship Final) कसोटी कारकीर्द संपुष्टात येऊ शकते अशा 5 भारतीय खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (ICC WTC Final: न्यूझीलंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडियासाठी हा खेळाडू ठरू शकतो ट्रम्प कार्ड, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघाना लोळवले आहे)

हनुमा विहारी (Hanuma Vihari)

हनुमा विहारी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचा एक भाग आहे. विहारी एक कसोटी तज्ज्ञ असून तो केवळ कसोटी स्वरूपात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतो, म्हणून कसोटी सामन्यांमध्ये त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. तथापि, गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये विहारी सतत कामगिरी करण्यात अपयशी ठरला.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये विहारीने तीन कसोटी सामने खेळले परंतु एकही अर्धशतक झळकावण्यात अपयशी ठरला. म्हणून, त्याच्या फ्लॉप फलंदाजी शोमुळे, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर विहारी कसोटी संघात आपले स्थान गमावू शकतो.

केएल राहुल (KL Rahul)

राहुल आणखी एक खेळाडू आहे ज्याचा कसोटी स्वरूपात फॉर्म खराब राहिला आहे. राहुल वनडे आणि टी-20 क्रिकेटमधील मौल्यवान खेळाडू असला तरी कसोटी प्रकारात त्याची कामगिरी ही चिंतेची बाब आहे. राहुलने अखेर ऑगस्ट 2019 मध्ये विंडीज विरोधात दोन कसोटी सामना खेळला होता. यादरम्यान त्याने 44, 38, 13, आणि 6 अशा धावा केल्या. नवोदित आणि युवर खेळाडूंनी त्यांच्या अविश्वसनीय कामगिरीने प्रभावित केल्यामुळे राहुलला 2020 अखेरीस आणि 2021 च्या सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटी मालिकेतून बाहेर करण्यात आले. त्यामुळे, राहुलचे टेस्ट टीममधील स्थान धोक्यात येऊ शकते.

रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha)

साहा कसोटी क्रिकेटमधील विकेटकीपरसाठी निवड समितीची पहिली निवड होता. तथापि, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत रिषभ पंतचा खेळ पाहून साहा कसोटी संघातील जागा पंतकडून गमावू शकतो असे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पंतने 97 आणि नाबाद 89 धावांची दोन शानदार खेळी केली ज्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. साहा न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघाचा भाग आहे पण पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. सामन्यानंतर, पंत स्पॉटलाईटमध्ये असताना निवड समिती साहाकडे दुर्लक्ष करू शकतात.