IND vs ENG Test Series: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान झाले पाच मोठे विक्रम, एका क्लिकवर घ्या वाचून
Team India (Photo Credit - X)

IND vs ENG Test Series: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका 4-1 ने शानदार पद्धतीने जिंकली. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. तर भारतीय संघ पहिला कसोटी सामना हरला होता. मात्र यानंतर टीम इंडियाने (Team India) दमदार पुनरागमन करत मालिका जिंकली. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 जानेवारी रोजी खेळला गेला आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्च रोजी संपला. ही मालिका जवळपास दीड महिना चालली. या मालिकेदरम्यान पाच मोठे विक्रम झाले. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. (हे देखील वाचा: IND vs ENG: भारतीय संघात 'या' 3 युवा खेळाडूंनी आपले स्थान केले पक्के! T20 विश्वचषकात देखील मिळू शकते संधी)

1. सर्वाधिक पाच बळी घेणारा भारतीय खेळाडू

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने 26 बळी घेतले. दोन्ही संघाकडून तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे तो भारताकडून सर्वाधिक पाच बळी घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 36 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये 35 वेळा 5 बळी घेतले आहेत.

2. अँडरसनने 700 कसोटी बळी पूर्ण केले

जेम्स अँडरसनने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत आपल्या कारकिर्दीत 700 कसोटी बळी पूर्ण केले. 700 कसोटी बळी घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला. अँडरसन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 700 हून अधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी मुथय्या मुरलीधरन (800 विकेट) आणि शेन वॉर्न (708 विकेट) यांनी ही कामगिरी केली आहे.

3. यशस्वी जैस्वाल यांने केला कहर

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या एका डावात त्याने एकूण 12 षटकार ठोकले. यासह, तो कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. वसीम अक्रमने कसोटी सामन्याच्या एका डावात 12 षटकारही ठोकले आहेत.

4. इंग्लंडने भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने गमावले 

इंग्लंड क्रिकेट संघाला भारताविरुद्ध सलग चार सामने पराभूत व्हावे लागले. यासह इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा संघ बनला आहे. इंग्लंडने आतापर्यंत भारताविरुद्ध 35 कसोटी सामने गमावले आहेत, जे सर्वाधिक आहे. ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्ध 32 कसोटी सामने गमावले आहेत. भारताविरुद्धचे सामने गमावण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

5. भारतीय संघाने प्रथमच केला असा विक्रम 

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत सलग चार सामने जिंकले. रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने 0-1 ने पिछाडीवर पडून ही मालिका 4-1 ने जिंकली. भारताव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे एकमेव संघ आहेत ज्यांनी पहिला सामना गमावल्यानंतर 4-1 ने मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दोनदा अशी कामगिरी केली आहे. इंग्लंड संघाने एकदा असे केले आहे.