पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाऊस बरसला असल्याने पाणीसाठ्याची चिंता मिटली आहे. सध्या पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चारही प्रमुख धरणे 100 टक्के भरली आहेत. सतत झालेल्या दमदार पावसामुळे धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, यामुळे पुणे शहर व परिसराला यंदा पाणीटंचाईची भीती नसल्याचं चित्र आहे. नक्की वाचा: Weather Pune: पुण्यात आज पाऊस पडेल का? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या.
पुण्यातील धरणांचा पाणीसाठा
#पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा; खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर १०० टक्के भरले.#Pune#WaterStorage #Monsoon2026 #WaterResources #Maharashtra #RainUpdate #DamStatus pic.twitter.com/IlEjVbX348
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) August 7, 2026
मुठा नदीत पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुण्यात यंदा धरणे भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीपात्रात किंवा पुलांजवळ जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
यंदाच्या वर्षी सुरुवातीला मान्सून उशिराने सक्रिय झाल्याने जून महिन्यात पुणे शहरात पाणीकपात लागू करावी लागली होती. जूनअखेरीस खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत खालच्या पातळीवर होता. मात्र जुलैच्या उत्तरार्धापासून धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आणि अवघ्या काही आठवड्यांत धरणे भरण्याच्या टप्प्यावर पोहोचली.
धरणांतील सध्याचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक असून, यामुळे पुढील अनेक महिन्यांसाठी पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता जवळपास संपुष्टात आली आहे, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.