अहमदनगर: मुस्लिम मामाने जिंकली सर्वांची मनं, मानलेल्या भाचींचे हिंदू पद्धतीने लग्न लावत केली सासरी पाठवणी
मुस्लिम मामाकडून भाचींचे लग्न (Photo Credits-Twitter)

आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात. तसेच धर्मांवरुन कधी कधी वाद निर्माण झाल्याचे सुद्धा दिसून येतात. परंतु याच दरम्यान एक भारतीय धर्मनिरपेक्षतेचे उदाहरण पहायला मिळेल अशी गोष्ट घडली आहे. तर अहमदनगर (Ahmednagar) मधील मुस्लिम व्यक्ती बाबाभाई पठाण याने मानलेल्या भाचींचे हिंदू पद्धतीने लग्न लावत सासरी पाठवणी केल्याची घटना सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. तसेच लग्न सोहळा उरकल्यानंतर पठाण मामाच्या डोळ्यात आपल्या भाचींसाठी अश्रु आल्याचे सुद्धा व्हायरल झालेल्या फोटोंतून दिसून येत आहे.

परंतु काही रिपोर्ट्सनुसार, पठाण याने दोन अनाथ मुलींना दत्तक घेतल्याचे सांगण्यात आले आहे. पण काहींनी या दोन्ही मुली अनाथ नसून त्यांची आई भुसारे ही बाबाभाई पठाण याला दरवर्षी राखी बांधते असे म्हटले आहे. कारण या दोन मुलींचा आईला भाऊ नसल्याने ती पठाण याला राखी बांधत असल्याचे ही सांगण्यात आले आहे.(कर्नाटक: कोप्पल येथील उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांचा पत्नीच्या मेणाच्या पुतळ्यासह नव्या घरात प्रवेश; पहा फोटोज)

भुसारे यांच्या पतीच्या निधनानंतर राखी बांधत असलेल्या पठाण मामाने दोन्ही मुलींच्या लग्नावेळी आपली भुमिका बजावत त्यांची सासरी पाठवणी केली आहे. त्याचसोबत रिपोर्टनुसार असे ही बोलले जात आहे की, बाबाभाई पठाण हा त्या दोन मुलींच्या मामासारखा होता. त्याने आपल्या पैशांतून दोन्ही भाचींचे लग्न लावले आणि लग्न सोहळा हा हिंदू पद्धतीनुसार पार पडला.