Uddhav Thackeray Warns Rahul Gandhi: 'वीर सावरकर आमचे दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही'; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

ठाकरे म्हणाले, ‘सावरकरांनी 14 वर्षे तुरुंगात काढली. तुरुंगात 14 वर्षे यातना सहन करणे हा मुलांचा खेळ नाही. म्हणून मी राहुल गांधी तुम्हाला आठवण करून देतो की, आम्ही आमच्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमची एकजूट तुटू देऊ नका.'

Uddhav Thackeray Warns Rahul Gandhi: 'वीर सावरकर आमचे दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही'; उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा
Uddhav Thackeray (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकतेच मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लोकसभा सचिवालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खासदार म्हणून अपात्र घोषित केले आहे. त्यानंतर शनिवारी (25 मार्च) एका मीडिया मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांनी टिप्पणी केली होती की, ‘माझे नाव सावरकर (Veer Savarkar) नाही, ते गांधी आहे. मी कधीही माफी मागणार नाही.’ यानंतर आता रविवारी, महाराष्ट्रातील मालेगाव येथे एका सभेला संबोधित करताना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना जाहीर इशारा दिला. आपण वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आज मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांनी 20,000 कोटी रुपये कोणाचे आहेत, असा प्रश्न विचारला होता, परंतु भाजपने यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. हिंडेनबर्गने हजारो कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे, पण भाजपने त्याकडे लक्ष दिलेले नाही. पंतप्रधानांनीही याचे उत्तर दिलेले नाही. उलट आमच्यासारख्या साध्या लोकांना ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सींनी वेठीस धरले आहे.

ते पुढे म्हणाले, ‘मला राहुल गांधींना एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, संजय राऊत तुमच्यासोबत चालले आहेत. ही लोकशाहीची लढाई आहे. मात्र, वीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांच्याबद्दलचा अनादर खपवून घेतला जाणार नाही. आम्ही लढायला तयार आहोत, पण आमच्या देवांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही.’ (हेही वाचा: Maharashtra Politics: बेकायदा समाधी हटवली नाही तर राम मंदिर बांधू, मनसे कार्यकर्त्याचे वक्तव्य)

ठाकरे म्हणाले, ‘सावरकरांनी 14 वर्षे तुरुंगात काढली. तुरुंगात 14 वर्षे यातना सहन करणे हा मुलांचा खेळ नाही. म्हणून मी राहुल गांधी तुम्हाला आठवण करून देतो की, आम्ही आमच्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमची एकजूट तुटू देऊ नका. तुम्हांला जाणूनबुजून भडकवले जात आहे, वेळ निघून गेली आहे आणि जर आम्ही आता कृती केली नाही, तर आमच्या देशावर हुकूमशाही येईल.’

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2023 10:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).