Trading Power Book By Priyam Gandhi: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने का दिला शिवसेनेला पाठिंबा? अजित पवार - देवेंद्र फडणवीस यांचे सरकार का पडले? सर्व नाट्याची कहाणी सांगणारे 'ट्रेडिंग पॉवर'
Devendra Fadnavis, Ajit Pawar took oath as CM and Deputy CM (Photo Credits: IANS)

प्रियम गांधी (Priyam Gandhi) लिखीत ट्रेडिंग पॉवर (Trading Power Book ) नावाच्या पुस्तकाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार ( Ajit Pawar) यांचा राजभवनात पहाटे पहाटे झालेला शपथविधी आणि त्यानंतर अवघ्या काही तासात कोसळलेले त्यांचे सरकार महाराष्ट्राने पाहिले. नंतर घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडी आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे सत्तेवर आलेले महाविकासआघाडी सरकार आदींचे उभा महाराष्ट्र साक्षीदार आहे. असे असले तरी फडणवीस आणि पवार यांनी पहाटे शपथविधी का उरकला? त्यांचे सरकार का पडले? शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस का तयार झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजही महाराष्ट्राच्या मनात कायम आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळत असल्याचा दावा लेखीकेने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात असलेला संघर्ष. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेले बार्गेनिंग यांसह सत्तावाटप आणि इतरही अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळत असल्याचे लेखिकेने म्हटले आहे. याशिवाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कसे आणि काय बोलणे झाले. सह्याद्री अतितीगृहावर झालेल्या बैठकीत नेमके काय ठरले. याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कसा संपर्क साधण्यात आला. त्यांची भूमिका काय राहिली यांसह शरद पवार यांचे नेमके धोरण त्याकाळात कसे राहिले याबाबतही या पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे. (हेही वाचा, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी दिली 'ही' मजेशीर प्रतिक्रिया)

मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत बेबबनाव निर्माण झाला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. दरम्यान, अजित पवार यांनी रातोरात हालचाल करत भाजपशी हातमिळवणी केली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. परंतू, हे सरकार अवघे काही तासच टिकले. या संदर्भातील सर्व घटना घडामोडी यांबाबत या पुस्तकात तपशीलाने लिहीण्यात आले आहे.