उपमुख्यमंत्री अजित पवारांसह घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी दिली 'ही' मजेशीर प्रतिक्रिया
Devendra Fadnavis, Ajit Pawar took oath as CM and Deputy CM (Photo Credits: IANS)

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा प्रसंग 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे घडला. हा प्रसंग राजकीय नेत्यांसह सामान्य जनतेला देखील खडबडून जागे करणारा होता. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार केवळ अडीच दिवस टिकले आणि सरकार पाडून महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस होता. या गोष्टीला आज एक वर्ष पूर्ण झालं. यावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता त्यावर मजेशीर प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. यापुढे पहाटे शपथ घेणार नाही असे ते म्हणाले आहे.

देवेंद्र फडणवीस सध्या औरंगाबाद येथे पदवीधर निवडणुकांच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यावेळी तेथील पत्रकारांनी या घटनेबद्दल विचारले असता, 'या पुढे पहाटे शपथ घेणार नाही, आता या पुढे तुम्हाला योग्य वेळी शपथविधी दिसेल,' असं म्हणतानाच त्यांनी अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावर आपण पुस्तक लिहिणं सुरु केले आहे असेही ते म्हणाले आहेत.हेदेखील वाचा- Sanjay Raut On Bjp Devendra Fadanvis-Ajit Pawar Oath: पहाटे पहाटे मला जाग आली…अजून ते झोपलेले नाहीत; संजय राऊत यांचा भाजपला पुन्हा टोला

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अडीच दिवसांसाठी बनलेले सरकार ही घटना महाराष्ट्रातील जनता कधीच विसरु शकत नाही. या घटनेने राजकारणाचे चित्रच बदलून टाकले होते. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनेकांच्या या दिवसाच्या आठवणीही जाग्या झाल्या असतील.

दरम्यान महाविकासआघाडीचे सरकार हे बेईमानी करुन आलेले सरकार आहे. त्यांनी कितीही स्वप्ने पाहली तरी त्यांना जनतेने निवडून दिलेले नाही असेही ते म्हणाले. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही असेही त्यांनी आपल्या अनेक भाषणात म्हटले आहे.