ज्येष्ठ शिवसेना मंत्र्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर 'आता ती वेळ गेली, माहविकासआघाडी सोबतच पुढे जाऊ'
Shiv Sen, BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ज्या वेळी आमचा हात आपल्या हाता होता तेव्हा तो हात झिडकाला. त्यामुळे आता सोबत येण्याची ती वेळ केव्हाच निघून गेली, असा टोला लगावत राज्याचे उद्योगमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना (Shiv Sena) नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना प्रत्युत्तर दिले. एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या आमचे महाविकासआघाडी सोबत चांगले चालले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांवर विश्वास ठेऊन चांगल्या पद्धतीने पुढे जात आहेत. त्यामुळे आता इतर विचार करण्याची वेळ केव्हाच गेली आहे, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सुभाष देसाई हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. या वेळी बोलताना सुभाष देसाई यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन काळानंतर भविष्याती महाराष्ट्रासमोरची आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबाबत आपली भूमिका मांडली. या वेळी देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. भाजपने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यांना शुभेच्छा. पण भाजपच्या या भुमिकेमुळे त्यांच्या मित्रपक्षांचे, आठवले, जानकर, सदाभाऊ खोत यांचे काय होणार हे माहित नाही. कारण, भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही देसाई या वेळी म्हणाले. (हेही वाचा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे घुमजाव, 'शिवसेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही')

राज्याच्या हितासाठी शिवसेना पक्षासोबत पुन्हा जाण्यास भाजप तयार आहे. मात्र, अटी लागू असतील, असे विधान करुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीची एक बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत झाली. या बैठकीची माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

चंद्रकात पाटील यांनी सांगितले होते की, भविष्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्वबळावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहायला हवे. त्यामुळे येत्या काळात भाजप कोणत्याही पक्षासोबत एकत्र निवडणूक लढणार नाही. फार फार तर निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकेल. या सर्वांसाठी अद्याप 4 वर्षांचा काळ आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळेच लढू. त्यातूनही शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला तर त्यावर केंद्रीय नेतृत्व विचार करेन, असे पाटील यांनी सांगितले होते.