SC Stays Maratha Reservation: मराठा समाजासाठी आज काळा दिवस: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil (Photo Credits: Twitter/ ANI)

सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) स्थगिती आणत 5 सदस्यीय घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा मोठा निर्णय दिला आहे. दरम्यान यामुळे आता मराठा आरक्षणाची वैधता तपासून निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा आरक्षण बंद ठेवले जाणार आहे. यावरून महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी महाविकास आघाडीवर टीका करत हा मराठा समाजासाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने यामध्ये लक्ष टाकले नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी यामध्ये लक्ष न दिल्याचं म्हटलं आहे. Maratha Reservation: मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकरी मध्ये देण्यात येणार्‍या एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालया कडून स्थगिती.  

दरम्यान महाविकास आघाडीच्या सरकारला कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही. त्यांनी पुरेशी तयारी केली नव्हती असं म्हणत हे सरकार आरक्षणाबद्दल गंभीर नव्हत.असं देखील म्हणाले आहेत. सरकारने कोरोना काळात नोकरभरती रोखली आहे असे सांगून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. त्यांनी योग्य युक्तीवाद करायला हवा होता. इतर राज्यांच्या आरक्षणाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. मात्र त्यांच्याकडे स्थगिती दिली नाही. केंद्राच्या 10 % आरक्षणाला देखील स्थगिती नाही. केवळ महाराष्ट्रातच असे झाले आहे. हे सरकारचं अपयश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत  ही प्रतिक्रिया देताना त्यांनी कंगना रनौत प्रकरणावरून देखील शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. सध्या ते लांडग्यांप्रमाणे तिच्या मागे लागले आहेत. असे म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिले जाणारे एसईबीसी आरक्षण (SEBC Act ) मिळणार नाही. पण आरक्षणानुसार झालेले पीजी मेडिकल प्रवेश अबाधित राहणार आहेत अशी माहिती देखील कोर्टाने आज दिली आहे. तसेच हे प्रकरण 5 सदस्यसीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. आता मराठा आरक्षणाची वैधता तपासली जाणार आहे.