Maha Vikas Aghadi: संजय राऊत यांच्या 'या' वक्तव्यावरून महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना युपीएचे अध्यक्षपद (UPA President) दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचे नाव पुढे असल्याची चर्चा आहे. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता एकूणच त्यांनी सध्या परिस्थितीविषयी भाष्य केले आहे. 'काँग्रेस पक्ष सध्या कमकुवत झाला आहे. त्यामुळे आता विरोधकांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत करण्याची गरज आहे,' असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राऊत यांनी नुकताच मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला आहे. दरम्यान, त्यावेळी त्यांनी काँग्रेसवरही भाष्य केले आहे. शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाल्यास आम्हाला आनंदच होईल. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यासाठी नकार दिला आहे. अधिकृतपणे असा काही प्रस्ताव समोर आल्यास आमचा त्यांना पाठिंबाच असणार. कारण, काँग्रेस आता कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी एकत्र येऊन 'यूपीए'ला मजबूत करण्याची गरज आहे,' असे राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत थिणगी पडण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Navneet Kaur on Sharad Pawar: शरद पवार यांच्या यूपीए अध्यक्षपदाबाबत नवनीत कौर यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत भाष्य केले होते. त्यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त दर्शवली होती. 'कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला पक्षात आणि लोकांमध्ये किती मान्यता आहे हे फार महत्त्वाचे असते. काँग्रेसजनांमध्ये गांधी-नेहरू घराण्याबद्दल आजही प्रचंड आस्था आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याची कमी दिसते,' असे पवार म्हणाले होते.