चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले सामंजस्य करार सध्या 'जैसे थे'; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
Subhash Desai (Photo Credit: Facebook)

चीन (China) मधील हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या 3 कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) 15 जून 2020 रोजी सामंजस्य करार केले होते. मात्र तूर्तास हे करार जैसे थे ठेवण्यात आले असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असंही सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक तळेगाव टप्पा-2 मध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण 5 हजार 20 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहणार असल्याचं सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - India-China Clash: मुंबई येथील घाटकोपर परिसरात मनसे कार्यकर्त्यांचे चीन विरोधात आंदोलन)

गलवाना घाटी मध्ये भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारताकडून चीनचा प्रचंड संताप्त व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भारतीयांनी चीनच्या अनेक वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे जे सैनिक शहीद झाले त्यात कर्नल रँकच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.