राजू शेट्टी यांचं महाआघाडी बद्दल मोठं विधान; राज  ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचा समावेश असेल तरच महा आघाडीमध्ये येणार
राजू शेट्टी (Photo Credit : You tube)

महाराष्ट्रामध्ये जशा विधानसभा निवडणूका (Maharashtra Legislative Assembly Election)  जवळ येत आहेत तशा आता राजकीय घडामोडींना वेग यायला सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या राहत्या घरी 'कृष्णकुंज' वर भेट घेतल्यानंतर आता महाआघाडीबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेस - एनसीपी सोबत असलेल्या राजू शेट्टींनी (Raju Shetti) आता महाआघाडीमध्ये राज ठाकरे यांचा मनसे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश नसल्यास आपण महाआघाडीचा भाग नसू असं व्यक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील 'भाजपा - शिवसेनेच्या' सत्तेला उलथून टाकण्यासाठी महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश असावा असं वक्तव्य केलं होतं.

महाराष्ट्र कॉंग्रेसचे नवं निर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलताना त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये राजू शेट्टी म्हणाले, ' लोकशाही टिकवण्यसाठी सम विचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचे आहे.' त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये मनसे आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र असल्यास ते महाआघाडीचा भाग असतील.

सध्या राजकीय जुळवाजुळव करत आगामी विधानसभा निवडणूकींना सामोरं जाण्यासाठी सारेच पक्ष कंबर कसून तयारी करत आहेत. सध्या महाराष्ट्रात विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजपा पक्षाची युती असेल असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं आहे. Maharashtra Assembly Election 2019: वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत फडकवणार स्वबळचा झेंडा? उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरु

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवानिर्माण सेनेला महाआघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अनेक नेत्यांनी त्यांची भेटही घेतली आहे. मात्र राज ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. लोकसभा निवडणूकी दरम्यानही राज ठाकरे महाआघाडीमध्ये सहभागी होणार अशी चर्चा होती मात्र त्यांनी थेट सहभाग न घेता भाजपाविरोधी प्रचार करत जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.