NCP MLA Rohit Pawar On Opposition: पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं- रोहित पवार
NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा 'पॅटर्न' कधीच यशस्वी होणार नाही,अशा शब्दात रोहित पवार यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे, या आधी देखील राजकारणासाठी 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा', 'माझे अंगण,माझे रणांगण' यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळेआता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा 'पॅटर्न' सर्वांच्या लक्षात आलेला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झालं,आज सुद्धा बिहार,उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार,खून सारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत. सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते,कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात. आपलं महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभा राहणार सरकार आहे,मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on Mumbai: शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रपासून तोडणारी ताकद यशस्वी होत नाही- संजय राऊत)

सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठरावीक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात. बिहार निवडणूक जवळ येताच महाष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले,आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहार मध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.