Jan Ashirwad Yatra: नारायण राणे यांना ब्राह्मणाची आठवण; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ शुद्धीकरणावरुन प्रतिक्रिया, प्रसारमाध्यमांवरही आगपाखड
Narayan Rane | Photo Credits: Facebook)

केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना जन आशीर्वाद यात्रेदरम्यान ब्राह्मणाची आठवण आली आहे. भाजपची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) सुरु आहे. यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी ते आज (शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021) सकाळी बोलत होते. नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यानंतर शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण गुरुवारी सायंकाळी केले. याबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे बोलत होते.

नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, मला कोणासमोर नतमस्तक व्हावे वाटते, कोणाला नमस्कार करायचा आहे तो माझा प्रश्न आहे. आता त्यानंतर जर कोणाला गोमूत्र शिंपडायचे असेल तर त्याला ते शिंपडू द्या. कोणाला प्यायचे असेल तरीही त्यांना ते पिऊ द्या. त्याच माझा संबंध नाही. आणि असे प्रश्न मला काय विचारता. ज्यांनी गोमूत्र शिंपडले त्यांनाच विचारा ना. काय अशुद्ध झालेहोते. स्मारक शुदध केले म्हणजे काय केले? त्यासाठी ब्राह्मण हवा ना? ब्राम्हण नाही काही नाही.. आम्हाला सांगितले असते तर आम्ही दिले असते. आमच्याकडे खूप आहे, असेही नारायण राणे म्हणाले. या वेळी बाळासाहेबांचे स्मारक पाहजे त्या स्थिती नाही. स्मारकाकडे जायचे तर दलदलीतून जावे लागते, असेही नारायण राणे या वेळी म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांवरही आगपाखड केली. पत्रकारिता हा लोकशाहीचा स्तंभ आहे. मी आपल्या पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला एक वेगळे स्थान आहे. राज्यकारभार करताना तुमच्या मतांना महत्त्व असते. आम्हालाही मार्गदर्शन मिळते. तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. पण सध्या देशातील प्रश्नांबाबत विचारण्याऐवजी पत्रकार मला केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयावर सतत विचारत असल्याचेही ते म्हणाले. आम्ही एवढ्या एकाच विषयासाठी आलो आहोत का? असेही ते म्हणाले. (हेही वाचा, BJP Jan Ashirwad Yatra: नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजप जन आशीर्वाद यात्रा सुरु, महत्त्वाच्या घडामोडी)

व्हिडिओ

अफगानिस्तानच्या मुद्द्यांना बगल

दरम्यान, अफगानिस्तानमध्ये निर्माण झालेल्या स्थितीबाबत विचारले असता, त्याबाबत आम्ही बोलू शकत नाही. त्या विषयावर बोलायचा अधिकार केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाच असल्याचे सांगत राणे यांनी अफगानिस्तानवरील प्रश्नाला बगल दिली.