Mumbai Rain Update: मुंबई, ठाणे, कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
Mumbai Rains (Photo Credits: PTI)

मागील 2-3 दिवसांपासून मुंबईसह राज्यात दमदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आज देखील मुंबई सह उपनगरांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

काल झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध ठिकाणी पाणी साचले. घरात, दुकानांमध्ये पाणी शिरले. तसेच वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी लोकं अडकून पडले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. आज सकाळपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी तो वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिकेने देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.

BMC ट्विट:

मुंबई शिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही येत्या 2 दिवसात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

काल झालेल्या अतिवृष्टीमुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी-बदलापूर दरम्यान रात्रीपासून अडकली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. मात्र NDRF, पोलिस, रेल्वे प्रशासन आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ट्रेनमधील प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्याचबरोबर कल्याणमधील कंबा जवळ पेट्रोल पंप, रिसोर्टमध्ये अनेकजण अडकून पडले होते. त्यांची देखील सुटका करण्यात NDRF ला यश आले. मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची अक्षरशः दैना केली.