Mumbai Metro Car Shed Project: कांजुर जागेचा वाद चर्चेतून सोडवायला पुढे या; विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
Uddhav Thackeray | File Photo

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज जनतेला संबोधत आगामी हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देतानाच विरोधकांचाही समाचार घेत विकासकामांना आडकाठी न लावता राजकारण करण्यासाठी मुंबईच्या मेट्रो प्रोजेक्ट करिता कार डेपो बनवण्यासाठी जागेचा वाद हा 'अहंकाराचा' विषय बनवू नका असं म्हणत कांजूरच्या जागेसाठी चर्चा करून प्रश्न सोडण्याचं आवाहन केले आहे. कांजुरच्या मुंबई मेट्रो कार डेपो साठी राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या जागेवर मिठागरं आणि केंद्र सरकारने आपला दावा ठोकला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देखील त्यावर 'जैसे थे' च्या ऑर्डर दिल्याने एमएमआरडीएची कोंडी झाली आहे. (हेही वाचा, Mumbai High Court stays the Kanjurmarg Metro Car Shed: कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पास मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती)

आज मुख्यमंत्र्यांनी आरे मधील जागा आणि कांजूर मधील जागा या दोन्हींच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आरेची जागा कमी पडू शकते, तसेच ती केवळ एका लाईनसाठी आहे. भविष्यात ती वाढवल्यास आरेचं जंगल, वन्यजीव धोक्यात येऊ शकतं. त्या तुलनेत कांजुरची जागा मोठी आहे. सुरक्षित आहे पण त्यावर केंद्र सरकारकडून दावा केला जात आहे. यामुळे विनाकारण प्रकल्पाला उशिर होत आहे. विकासकामांमध्ये राजकारण आणू नका हे जनतेसाठीचे प्रकल्प आहे. बोलून, चर्चा करून प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे चर्चेला या असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केले आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मुंबई मेट्रो 3 साठी आरे मध्ये 25-30हेक्टर जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना, मनसे सह पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला होता. महाविकास आघाडीने कांजुरची जागा कार डेपो साठी निश्चित करत तेथे मेट्रो 3 सोबत अन्य 2 लाईन साठी देखील तेथेच डेपो बांधण्याची घोषणा केली आहे. मात्र आता त्याला कोर्टाकडून स्थगिती आली आहे.