मुंबईतील धारावीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी 4 हजार 407 खाटांची क्षमता असणारे अलगीकरण विभागाची सुविधा उपलब्ध
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहेत. तसेच वैज्ञानिकांकडून कोरोनावरील लसीचा शोध घेतला जात आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांसाठी कोविड आणि क्वारंटाइन सेंटरची सोय करण्यात येत आहे. याच दरम्यान मुंबईतील धारावीत सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांसाठी 4 हजार 407 खाटांची क्षमता असणारे अलगीकरण विभागाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

धारावीत दररोज नव्याने कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे धारावीला कंन्टेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त पाळण्यात येत आहे. धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून मुंबई महापालिकेकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धारावीत 150 डॉक्टरांच्या एका पथाकाने तेथील नागरिकांची स्क्रिनिंगच्या माध्यमातून तपासणी केली होती.(CM Uddhav Thackeray Facebook live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन; जाणून घ्या त्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे)

दरम्यान, महाराष्ट्रात आज नवे 3041 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 58 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 50231 वर पोहचला आहे. त्यापैकी 33988 जण अॅक्टिव्ह असून एकूण 1635 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 14600 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.