इगतपुरी येथील तोडफोड प्रकरणात राज ठाकरे यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता
राज ठाकरे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये इगतपुरी येथे परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलन आणि तोडफोड प्रकरणात पक्षाध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी राज ठाकरे यांची मुक्तता केली आहे. इगतपुरी (Igatpuri Session Court) न्यायालयाने ही मुक्ताता केली.

काय आहे प्रकरण?

सन 2008 मध्ये परप्रांतीयांना रेल्वेभरतीत प्राधान्य दिले जात असल्याच्या कारणावरुन मनसे कार्यकर्त्यांनी आंदोनल केले होते. हे आंदोलन हिंसकही झाले होते. दरम्यान, या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी हा अटकेचा निषेध म्हणून इगतपुरी येथील मुंबई आग्रा-महामार्गावर असलेल्या एका परप्रांतीय हॉटेलवर हल्ला केला होता. हा हल्ला राज ठाकरे यांनी दिलेल्या चिथावणीमुळेच झाला होता, असा आरोप होता. (हेही वाचा, राज ठाकरे साहेब जरा सांभाळून... आमच्याकडे सुद्धा आहेत व्हिडिओ, भाजप पक्षाने उडविली खिल्ली)

दरम्यान, या हल्ल्यानंतर राज ठाकरे यांच्या विरोधात इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तसेच, इगतपुरी येथील न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. पक्षप्रमुख या नात्याने या खटल्यात राज ठाकरे यांचे नाव होते. दरम्यान, गेली अनेक वर्षे सुरु असलेल्या या खटल्यातील सहा संशयीत आरोपींना न्यायालयाने या आधीच निर्दोष  मुक्त केले होता. तर, 18 डिसेंबर 2018 रोजी राज ठाकरे हे इगतपुरी कोर्टात सुनावणीसाठी हजर झाले होते. दरम्यान, आता कोणताही सबळ पुरावा नसल्याच्या कारणास्तव न्यायालयाने राज यांना निर्दोष मुक्त केले आहे.