Marathwada Districts Face Drought-Like Situation: मराठवाडा मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती; केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार
Farmers | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्रात अनेक भागामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यातील (Marathwada) स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 जणांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहे. 13, 14 डिसेंबर दिवशी हे पथक मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना (Jalana), बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांमध्ये पथक भेट देणार आहे.

केंद्राचे हे पथक 15 डिसेंबरला पुण्यात बैठक घेऊन त्यांचा अहवाल केंद्र शासनाकडे देणार आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत.

मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस न झाल्याने अनेक भागात ऐन डिसेंबरमध्येच दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. शेतकरी अडचणी मध्ये आहे. काही पिकांचे नुकसान हे अवकाळी पावसाने झाले आहे. त्यामुळे राज्यासोबतच केंद्रानेही शेतकर्‍यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना काय मदत मिळते? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. Marathwada Farmers Suicide: मराठवाड्यात शेतकरी संकटात, कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या .

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना जिल्ह्यात, बीड व धाराशिव जिल्ह्यांत 13 डिसेंबर रोजी पाहणी होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर रोजी पुणे व सोलापूर, नाशिक व जळगावमध्ये दोन वेगवेगळे पथके जातील. पाहणी केल्यावर 15 डिसेंबर रोजी पथक पुण्यात बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला दिला जाणार आहे.