
महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची रिमझिम जरा थांबल्यानंतर अनेक जण उकाड्याने हैराण झाले आहेत. पण राज्यात 13 ऑगस्टपासून पावसाचं पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे राहतील. हा पाऊस मागील जोरदार पावसाच्या तुलनेत कमी असणार आहे. कोकण पट्ट्यामध्ये पुढील दिवस सर्वत्र पाऊस बरसणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाच्या सरी अधून मधून बरसण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
हवामान विभागाचा अंदाज
पुढील 5 दिवस 11 ऑगस्ट ते 15 दरम्यान अपेक्षित हवामान : pic.twitter.com/5amLfy4Kec
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 11, 2021
मागील काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यात तापमानामध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई उपनगरामध्ये सध्या किमान 26.5 अंश तर कमाल 31.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ही वाढ सरासरीपेक्षा 2 अंश अधिक वाढ झाली आहे तर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्येही तापमानात 2 अंश वाढ नोंदवण्यात आली आहे.