Maharashtra Police Bharti 2021 GR Canceled: पोलीस भरती जीआर सरकारने काढला आणि रद्द करुन पुन्हा माघारी धाडला
Home Minister Anil Deshmukh azare, Popatrao Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Police Recruitment 2021: निर्णय प्रक्रियेवरुन चर्चेत असलेले महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्य सरकारने पोलीस भरती 202 (Maharashtra Police Bharti 2021) बाबत एक जीआर काढला. नामुष्कीजनक गोष्ट अशी की राज्य सरकारला अवघ्या काही तासांतच हा जीआर (GR) परत घ्यावा लागला आहे. राज्य सरकारने हा जीआर परत घेतला असून, आता पुन्हा नवा सुधारीत जीआर शुद्धीपत्रकासह काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने परत घेतलेला जीआर 4 जानेवारी रोजी काढला होता. यात एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळावा यासाठी नवे शुद्धीपत्रक काढले जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज (7 जानेवारी 2021) याबाबत माहिती दिली.

राज्याच्या गृह विभागाने 4 जानेवारी रोजी काढलेला जीआरमध्ये उल्लेख होता की, एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल. जीआरमधील या उल्लेखाला मोठा विरोध झाला. त्यानंतर गृह विभाग एक पाऊल मागे आला आणि त्यांनी जीआर मागे घेतला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले की, पोलीस शिपाई भरती 2019 करिता अर्ज केलेल्या एसईबीसी (#SEBC) उमेदवारांना दिलासा. गृह विभागाने 4 जानेवारी 2021 रोजी काढलेला शासन निर्णय रद्द. त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या 23 डिसेंबर 2020 च्या निर्णयाचा लाभ देण्यासाठी लवकरच सुधारित शासन निर्णय काढणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Police Bharti 2021: पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्रालयाकडून GR जारी; SEBC आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय)

दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने 4 जानेवारी रोजी काढलेल्या जीआरमध्ये भरती प्रक्रिया एसईबीसीचे आरक्षण न ठेवता पार पाडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तसेच, 'एसईबीसी'तून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करुन तीच पात्रता ठरविण्यात येणार होती. यासोबत खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचा विचार खुल्या प्रवर्गातूनच करावा असेही या जीआरमध्ये म्हटले होते. मात्र, आता राज्य शासनाने हा जीआरच रद्द केला आहे.