
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज पासून अकरावी साठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक त्रृटींमुळे mahafyjcadmissions.in ही अधिकृत वेबसाईट प्रवेश प्रक्रियेसाठी बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान वेबसाईट वर ' सध्या साईट बंद आहे. थोड्या कालावधीने पूर्ववत होईल ' असा मेसेज स्क्रोल केला जात आहे. विद्यार्थ्यांना वेबसाईट वर लॉगिन देखील करता येत नसल्याने पालक, विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेल्पलाईन नंबरवरही माहिती मिळत नसल्याची अनेकांची तक्रार आहे. आज सकाळी वेबसाईट वर 504 गेटवे टाईम आऊट असा एरर दिसत होता.
यंदा अकरावी प्रवेशप्रक्रियेमध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या सुमारे 20 लाख जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच कोकण विभाग वगळता अन्य 8 विभागीय मंडळांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑनलाईन होणार आहेत.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
21 मेपासून 28 मेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रत्यक्ष नोंदणी करता येणार आहे. 30 मे दिवशी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर 3 जूनला पहिली यादी प्रसिद्ध होणार आहे. 6-12 जून दरम्यान कॉलेज साठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर 14 जूनला दुसरी यादी जाहीर होणार आहे. नक्की वाचा: Career After 10th Fail: दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी कोणती? जाणून घ्या शिक्षणाशिवाय यशस्वी होण्याचे पर्याय.
अकरावीचे वर्ग 1 जुलैपासून सुरू करण्यासाठी महाविद्यालयांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण जागांपैकी 50 टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा 1 जुलैपासून वर्ग सुरू करण्यास शिक्षण संचालनालयाकडून शाळा व्यवस्थापनाला मुभा देण्यात आली आहे.