महाराष्ट्र भाजप नेत्यांचे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सरकारविरोधात आंदोलन, शिवसेना खासदार संजय राऊत यांची 'मेरा आंगन मेरा रणांगन' वर टीका
Shiv Sena MP Sanjay Raut |(Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सुरु असलेले 'मेरा आंगन मेरा रणांगन' (Mera Aangan Mera Ranangan Agitation) हे आंदोलन खरे तर केंद्रातील भाजप (BJP) सरकार विरोधात आहे. हे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अमित शाह यांच्या विरोधातील आहे. राज्यातील भाजप पुढाऱ्यांना राज्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे अशा काळात महाराष्ट्राला साथ द्यायचे सोडून ते आंदोलन करत बसले, अशा शब्दात शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी भाजपच्या 'मेरा आंगन मेरा रणांगन' आंदोलनावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महावकासआघाडी सरकार हे पंतप्रधान, केंद्रीय, गृहमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत योग्य समन्वय राखून काम करत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

भाजपला आंदोलन करायचेच होते तर आयएफसी सेंटर हे महाराष्ट्रातून गुजरातला नेण्यात आले तेव्हा हे आंदोलन केले असते तर ते महाराष्ट्राच्या कामी आले असते. पण, तेव्हा गप्प बसून त्यांनी महाष्ट्र द्रोह केला. ही वेळ आंदोलनाची नाही. सर्वानी एकत्र येऊन लढण्याची आहे. तरीही हे लोक आंदोलन करत बसलेत. खरं म्हणजे मुळात हे आंदोलनच नाही. असलेच तर त्याला जनतेचा पाठींबा नाही. या आंदोलनात नागरिक उतरले नाहीत. रस्त्यावरुन मी येताना पाहिले. मला एकही कावळा दिसला नाही. त्यामुळे कावळ्यांवर ठपका नको, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार हे कोरना विरुद्धच्या लढाईत अपयशी ठरले आहे, असा भाजपचा आक्षेप आहे. सरकारला लक्ष करण्यासाठी भाजपने 'मेरा आंगन मेरा रणांगन' हे आंदोलन सुरु केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिला होता. त्यानुसार भाजपने हे आंदोलन केले. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणडवीस हे मुंबई येथून या आंदोलनात सहभागी झाले. (हेही वाचा, Coronavirus: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अभासी जगात वावरत आहेत- देवेंद्र फडणवीस)

दरम्यान, भाजपच्या या आंदोलनावर सत्ताधारी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. राज्याचे महसूलमंत्री, आणि काँग्रेस प्रवक्ते बाळासाहेब थोरात यांनी तर चंद्करांत पाटील यांचे अंगन कोणते? देवेंद्र फडणवी हे तरी आपल्या आंगणात गेले होते का? सवाल विचारला आहे. तर, राजकारण न करण्याचं अनेकदा आवाहन करुनही तुम्ही ते टाळूच शकत नाही का? एकतर लोकांच्या हक्कासाठी आणि कोणत्याही उत्स्फूर्त आंदोलनासाठी अशा लिखित मार्गदर्शनाची गरज नसतेच. पण तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाप्रमाणे कपडे, रंग, मीडिया, घोषणा, अंतर असं सगळं कसं लिहून दिलं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.