Popular Front of India चं 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं होतं उद्दिष्ट;  Maharashtra ATS chief Vineet Agarwal
Anti-Terrorism Squad (file Photo)

Popular Front of India या संघटनेवर तातडीच्या कारवाईचं समर्थन करताना आज महाराष्ट्र एटीएस चीफ विनीत अग्रवाल (Maharashtra ATS chief Vineet Agarwal) यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पीएफआय 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र म्हणून बदलण्याच्या विचारात होते. सोबतच आरएसएस आणि भाजपाचे नेते हीट लिस्ट वर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यांनी पीएफआय ला बॅन करणं आवश्यक असल्याचं सांगताना ही संघटना देशासाठी स्लो पॉयझन म्हणून काम करत असल्याचं म्हटलं आहे.

पीएफआय वर वेळेतच बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस कडून अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. 21 जणांना अटक करण्यात आली असून इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आता बंदी नंतर ही संघटना बरखास्त झाली आहे. या संघटनेला आता पुन्हा आंदोलनासाठी एकत्र येता येणार नाही. असेही ते म्हणाले आहेत.

पीएफआय चे सदस्य त्यांना समाजिक विकासासाठी आणि फिजिकल एज्युकेशन साठी लेक्चर देत होते. ते समाज विघातक काम करत होते. स्वरक्षणासाठी दगड, चाकू, तलवारी, धारदार वस्तू, वीटा ठेवण्याचा सल्ला देत होते. 'तुमच्या रक्षणासाठी मुघल येणार नाहीत. तुम्हांलाच तुमचं रक्षण करावं लागेल' असे ते सांगत होते. एटीएस चीफ च्या माहितीनुसार त्यांच्याकडे सध्या 2 हजाराहून अधिक लोकं प्रशिक्षित आहेत.

सध्या पीएफआय कडील डाटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. हेट क्राईमच्या माध्यमातून त्यांनी भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा मनसुबा आखला होता. पण केंद्र सरकारच्या कारवाईने त्यांचा सारा कट उधळला गेला आहे. टेरर फंडिंग बाबतही अधिक तपास सुरू आहे. त्यांची बॅंक अकाऊंट सील करण्यात आली आहे.