Maharashtra Assembly Election 2019: लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, सध्या मात्र फेरबदल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी दिली माहिती
CM Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

Maharashtra Assembly Election 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य मंत्री मंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या बदललेल्या खात्यांबाबतही माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन अनुक्रमे पुणे आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. या शिवाय मंत्रिमंडळातही काही फेरबद केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. लोकसभा निवडणूक 2019 नंतर निर्माण झालेल्या रिक्त जागा, आगामी लोकसभा निवडणूक 2019 डोळ्यासमोर ठेवता भासणारी राजकीय गरज आणि इतर अनेक कारणांमुळे अखेर राज्यातील फडणवीस सरकारला राज्य मंत्री मंडळाचा विस्तार करावा लागला, अशी चर्चा या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळात कार्यरत असलेले मंत्री गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडूण गेले आहेत. घटनेच्या नियमानुसार त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे सहाजिकच बापट यांच्याकडे असलेल्या खात्यांचा कारभार इतर मंत्र्यांकडे सोपवला जाणार होता. उत्सुकता इतकीच होती की रिक्त जागा मुख्यमंत्री कशा भरतात. सध्या तरी गिरीश बापट यांच्याकडे असलेली पुण्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर, चंद्रकात पाटील यांच्याकडचे जळगावचे पालकमंत्रीपद जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Election 2019: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते, मंत्री, पदाधिकाऱ्यांची 'मातोश्री'वर बैठक; युतीच्या जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता)

दरम्यान, मंत्रिमंडळात केलेल्या फेरबदलानुसार, गिरीश बापट सांभाळत असलेल्या अन्न व औषध पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री पदाची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. त्यापैकी अन्न व औषध पुरवठा मंत्रालयाचा कारभार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपवीण्यात आला आहे. तर, संसदीय कामकाज मंत्रालयाचा कारभार शिक्षणमंत्री विनोद तावडे पाहणार आहेत.