Devendra Fadnavis: कोरोनाच्या नावाखाली ठाकरे सरकारकडून लोकशाहीला कुलूप, देवेंद्र फडणवीस यांची महाविकासआघाडी सरकारवर टीका
Devendra Fadnavis | (File Photo)

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाच्या पुर्वसंध्येला राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या नावाखाली राज्य सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकण्याचे काम केले आहे. राज्य सरकार जर जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू देत नसेल तर आम्ही ते जनतेच्या दरबारात जाऊन मांडू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. सरकारने विरोधकांची कितीही कोंडी केली तरी आम्ही आमचे प्रश्न मांडत राऊ. जनतेसाठी आवाज उठवत राहू. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणीवीस बोलत होते. या वेळी बोलताना फडणवीस यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. सरकार या अधिवेशनात विरोधकांना कोणतेही संसदीय आयुध वापरु देणार नाही. अधिवेशन कालावधी आणि एकूण कार्यक्रमाची आखणीच तशी केली आहे. परंतू, आम्ही गप्प बसणार नाही. जर संसदीय आयुधं वापरायची नाहीत. प्रश्न, उत्तरं नाहीत तर मग हे कसेल अधिवेशन? असा सवालही फडणवीस यांनी या वेळी उपस्थित केला. सरकारला विचारावेत असे विविध विषयांवरील 100 प्रश्न आमच्याकडे आहेत. परंतू, सरकारने अशी स्थितीच निर्माण केली आहे की, प्रश्नच विचारता येत नाहीत. (हेही वाचा, Ramdas Athawale Poem: देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामदास आठवले यांना मुख्यमंत्री पदाची आठवण)

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे. त्यामुळे सरकारची एक एक अशी अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. मागच्या अधिवेशनात काहीचे राजीनामे गेले. आता पाठिमागील इतिहास पाहता सरकार सावध झाले आहे. आता या अधिवेशनात कोणाचे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी सरकारने अधिवेशनाला कात्री लावत अवघ्या दोन दिवसांचे अधिवेशन घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी या वेळी केला.

देवेंद्र फडणवीस ट्विट

सरकारने प्रसिद्धीवर मोठ्या प्रमाणावर खर्च सुरु केला आहे. हा आकडा काहीशे कोटी रुपयांच्या घरात आहे. आमच्या काळात आम्ही कधीच प्रसिद्धीवर इतका खर्च केला नाही. महत्त्वाचे म्हणजे सर्व कामे बंद आहेत. जर कामेच बंद असतील तर मग प्रसिद्धी कसली करतात काय माहिती. या सर्वांचीच चौकशी व्हायला हवी असेही फडणवीस यांनी या वेळी म्हटले.