Suspicious Boat Harishwar Beach: मस्कत येथून युरोपकडे निघालेली 'लेडीहान' रायगड जिल्ह्यात धक्क्याला, हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोटीचा लागला छडा
Ladyhan Boat | (Photo Credit -ANI/Twitter)

रायगड (Raigad) जिल्ह्याील श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या हरिहरेश्वर (Harihareshwar) येथील समुद्र किनारी आलेल्या संशयास्पद बोटीमुळे (Suspicious Boat) देशभर खळबळ उडाली. महाराष्ट्र पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक, याशिवाय केंद्रीय गुप्तचर यंत्रणा कामाला लागल्या. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारही एकमेकांच्या संपर्कात राहिले. प्रसारमाध्यमांनी तर ही बोट दहशतवाद्यांची असू शकते असे म्हणत अनेक शंका उपस्थित केल्या. अखेर या संशयास्पद बोटीचा छडा लागला आहे. ही बोट ऑस्ट्रेलिय नागरिकाची आहे. बोटीचे इंजिन बिघडल्याने ही बोट समुद्री प्रवाहाने महाराष्ट्रात किनारपट्टीवर आली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत एक सविस्तर निवेदन विधिमंडळात दिले आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील किनारपट्टीवर आलेली बोट इंजिन बिघडल्याने नादुरुस्त झाली होती. त्यामुळे समुद्री प्रवाहाने तरंगत ती हरिहरेश्वर येथे आली. या बोटीचे नाव 'लेडीहान' (Ladyhan) असे असून, तिची मालकी ऑस्ट्रेलियन महिलेकडे आहे. या महिलेचा पती जेम्स हार्बट (James Harbutt) हा या बोटीचा कप्तान होता. मस्कत येथून युरोपच्या दिशेने निघालेली ही बोट प्रवासात असताना तिचे इंजिन बंद पडले. त्यामुळे समुद्रातून दिशाहीनपणे प्रवास करताना एका कोरीयन जहाजाने या बोटीवरील नागरिकांना सोबत घेतले. त्यांचे प्राण वाचले मात्र, ही बोट त्यांना सोबत घेता आली नाही. त्यामुळे साधारण 16 मिटर लांबीची ही बोट समुद्री प्रवाहासोबत भरकटत वाहू लागली. बोटीवर काही कागदपत्रे 3 एके-47 रायफल आणि काही काडतूसे तसेच इतरही काही गोष्टी आढळून आल्या आहेत. (हेही वाचा, Raigad: हरिहरेश्वर येते संशयास्पद बोटीमध्ये मिळालेल्या AK 47 बंदुका, महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न?)

ट्विट

बोटीची आणि त्यावर सापडलेल्या कागदपत्रे आणि इतर साहित्याची पडताळणी झाली आहे. यात कोणत्याही प्रकारचा दहशतवादी धाका अद्यापपर्यंत तरी दिसून आला नाही. तरीही राज्यभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय भारतीय कोस्टगार्ड आणि इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्या आली आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. राज्यात आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेतली जाईल, असेही गृहमत्र्यांनी सांगितले.