'गेल्या 4 वर्षांत एकदाही राहुल गांधींना भेटू शकलो नाही, उदयपूरच्या शिबिरात आत्मपरीक्षण झाले नाही'- Prithviraj Chavan यांची नाराजी
Prithviraj Chavan | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस (Congress) नेतृत्वात बदलाची मागणी करणाऱ्या पक्षाच्या G-23 गटातील आणखी एका नेत्याने पक्षात चालू असलेल्या गोष्टींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले की, ते गेल्या 4 वर्षांत एकदाही राहुल गांधींना भेटू शकलेले नाहीत. उदयपूर येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात आत्मपरीक्षण करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केले.

त्यांनी सांगितले की, ते जेव्हाही दिल्लीत असतात तेव्हा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना भेटतात. त्यांची तब्येत आता पूर्वीसारखी नसली तरी ते नेहमी बोलायला तयार असतात. जेव्हा त्यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली तेव्हा त्या चव्हाण यांना भेटल्या. पण जवळपास 4 वर्षे झाली ते राहुल गांधींना भेटू शकले नाहीत. पक्षनेतृत्व हवे तितके सुलभ नसल्याचे त्यांची तक्रार आहे.

उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिराचे आयोजन केले होते, मात्र पक्षावर अधिक विश्वास असलेल्या काही लोकांनी विचार करण्याची किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही, असे ठरवले. त्यामुळे या बैठकीनंतर पक्षाच्या भवितव्यावर विचार करण्याची गरज नसून काम करण्याची गरज असल्याचे लक्षात आले.

चिंतन शिबिरात प्रामाणिक आत्मपरीक्षण व्हायला हवे होते, असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, कपिल सिब्बल यांनी काँग्रेस सोडल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मला वाटते की सिब्बल यांना वाटत होते की, काँग्रेस नेतृत्वाला प्रामाणिक सल्ले मिळत नाहीत आणि काही लोक पक्ष नेतृत्वाला आवडतील अशाच गोष्टी बोलत आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘जबाबदारी निश्चित करून प्रामाणिक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कामगिरीचा विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र समितीचा अहवाल कपाटातच राहून गेला, जे योग्य नाही.’ (हेही वाचा: Mohit Kamboj: भाजप नेते मोहित कंबोज यांना फसवणूक प्रकरणात अटकेपासून संरक्षण)

ते म्हणाले, ‘जर 2024 मध्ये आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर आगामी 12 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. समविचारी पक्षांसोबत मोठी युती करावी लागेल.’ माजी केंद्रीय मंत्री असलेले चव्हाण हे G-23 चा भाग आहेत जे अलीकडच्या काळात निवडणुकांतील सलग पराभवानंतर पक्षात संघटनात्मक सुधारणा होण्याबाबत भाष्य करत आहेत.