देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता जाताच महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या टीकेतील महत्त्वाचे मुद्दे
Former Chief Minister Devendra Fadnavis | (Photo Credit: Facebook)

महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचे आक्रमक राजकारण मोडीत काढत मोठ्या नाट्यपूर्णरित्या सत्तासोपान चढला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार धक्का बसला. त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. अल्पावधीतच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena-Nationalist Congress-Congress)पक्षाचे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) सत्तेवर आले. मात्र, हे सरकार सत्तेवर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी टीकेचा सपाटाच लावला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांपासूनच देवेंद्र फडणवीस यांनी टीकेचा सपाटा लावला आहे. गेल्या काही तासांत देवेंद्र फडणवीस यांनी कोणकोणत्या मुद्यांवर महाविकासआघाडी सरकारवर टीका केली पाहूयात.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र विकासाबद्दल किमान समान कार्यक्रमात उल्लेख नाही

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!

देवेंद्र फडणवीस ट्विट

बहुमताचे दावे कशासाठी?

कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी?

देवेंद्र फडणवीस ट्विट

स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का?

या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का? (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, मंत्रालयात प्रशासनाची लगबग सुरु)

देवेंद्र फडणवीस ट्विट

महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!

भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!

देवेंद्र फडणवीस ट्विट

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक 2019 नंतर देशभरात भारतीय जनता पक्षाचा विजयरथ चौफेर दवडताना पाहायला मिळाला. लोकसभा निवडणूक 2014 नंतर देशभरात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या विजयाचा प्रभाव पाहायला मिळाला. लोकसभा निडणूक 2019 आणि विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2019 मध्येही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचीच सरशी झाली. नाही म्हणायला अपवाद म्हणून राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली. पण, काही राज्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरुनही काँग्रेस आणि संपुआला विरोधी पक्षात बसावे लागले. भाजपच्या आक्रमक राजकारणामुले काँग्रेस आणि संपुआची मोठी पिछेहाट झाली. महाराष्ट्र मात्र याला अपवाद ठरला.

महाराष्ट्रात शरद पवार यांचे राजकीय कसब कामी आले आणि भाजपच्या आक्रमक राजकारणाला पायबंध बसला. विशेष म्हणजे राज्यात काँग्रेस नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असताना आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताबाजारात सर्वात छोटा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. देशभराती राजकीय वर्तुळासाठी हा मोठा आश्चर्यकारक क्षण होता. पण, असे घडले खरे. त्यामुळे या सरकारकडे देशाचे लक्ष लागले आहे.