Farmers March In Maharashtra: संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा आज राजभवनावर धडकणार
Farm Law | Photo Credits: Twitter/ ANI

दिल्लीमध्ये मागील दोन महिने कृषी कायद्याविरूद्ध शेतकर्‍यांचा आवाज बुलंद ठेवत नवे कृषी कायदे रद्द (Farm Law) करण्याची मागणी करत असलेल्या शेतकर्‍यांसाठी पाठिंबा देण्याकरिता आता राज्यातही शेतकरी एकवटले आहे. आज (25 जानेवारी) मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध 21 जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत दाखल झाले. दरम्यान आज ते राजभवानावर (Maharashtra Rajbhavan) मोर्चा काढत आपला निषेध नोंदवणार आहेत.

दरम्यान किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अनिल नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार हा विराट मोर्चा केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात लढणार्‍या दिल्लीतील शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आहे. आज या मोर्चामध्ये एनसीपी अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. Kisan Morcha: अखिल भारतीय किसान सभेच्या विराट मोर्च्याला NCP शरद पवारही उपस्थित राहणार.

आज सकाळी दक्षिण मुंबईत आझाद मैदानात जाहीर सभा आणि नंतर दुपारी 2 च्या सुमारास हा मोर्चा राजभवनावर धडकेल. या मोर्चामध्ये कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर देखील काळजी घेतली जात आहे. वाहतूकीच्या दृष्टीने देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.