Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचे गंभीर आरोप, तपास NIA कडे देण्याची मागणी
Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

रिलायन्स (Reliance) उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटक सापडल्या प्रकरणावरुन विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणावरुन जोरदार आणि गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामध्ये अनेक शंका उपस्थित होतात आणि शंकेला वाव देणारे पुरावेही पुढे येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) द्यावा अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही ही मागणी केली आहे. तसेच, ट्विटरच्या माध्यमातूनही त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. ही संपूर्ण चौकशी NIA ला द्यावी, अशी आमची मागणी आहे.'' पुढच्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ''त्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या. गाडी ओळखल्याबरोबर श्री सचिन वझे पहिल्यांदा पोहोचले. तीन दिवसांपूर्वी सचिन वझे यांना काढले. ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद. वझे ठाण्यातील, गाड्या ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद.''

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडणे आणि त्यानंतर घडलेला घटनाक्रम हा संशय निर्माण करणारा आहे. हे वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाल. त्यावर ‘जैश उल हिंद‘ नावाने एक पत्र आले. या पत्रात क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही अकाऊंट नव्हते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात स्फोटकांनी भरलेलं वाहन ओळखल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम पोलीस अधिकारी सचिन वझे हे त्या ठिकाणी पोहोचले. इतर कोणताही पोलीस अधिकारी अथवा क्राईम ब्रँचचे अधिकारी पोहोचण्या आधी सचिन वझे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांची तपास अधिकारी म्हणूनही नेमणूक करण्यात आली. परंतू, आता या प्रकरणाच्या तपासासाठी आणखी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे वझे यांना का काढण्यात आले याबाबत काहीही समजले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यावा असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.