
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि लॉकडाऊन (Lockdown) या काळात घरातील विद्यूत दिवे (लाईट) बंद करुन दिवे घरातच दिवेलागण करण्याचे अवाहन देशवासियांना केले आहे. पंतप्रधानांच्या या अवाहनावर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नामोल्लेख टाळत ट्विटरद्वारे जोरदार उपहास करुन टोला लगावला आहे. हा टोला लगावतानाच संजय राऊत यांनी 'साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोलां,' असे म्हणत परिस्थिती आणि जबाबदारी याची जाणिवही करुन दिली आहे.
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आहे?
खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झालं. साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोला''.
संजय राऊत हे आपल्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. ते एक राजकीय नेते आहेत तसेच एका वृत्तपत्राचे संपादकही आहेत. त्यामुळे शब्दांवर आणि मराठी भाषेवर असलेली पकड ते आपल्या विधानांमधून नेहमीच दाखवून देतात. त्यांची ट्विट असो की विविध विषयांवर केलेली विधाने. विरोधकांवरही अनेकदा ते अशाच खोचक शब्दांचा वापर करुन टीका करतात. त्यामुळे नेहमीचते प्रसारमाध्यमं आणि लोक यांच्यात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरतात. (हेही वाचा, कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा रोग भाजपाला जडला आहे- बाळासाहेब थोरात)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अवाहनावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. काहींच्या मते पंतप्रधानांनी एकतेचा संदेश देत दिवे लावण्यास सांगितले. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत आपण सगळे सोबत असल्याचे जगाला दिसेल असे या संदेशाच्या समर्थकांचे म्हणने. तर, दिवे लावा, टाळ्या, थाळ्या वाजवा हे सांगणे पंतप्रधानांचे काम नव्हे. त्यांनी देश, देशाचा विकास, लॉकडाऊन काळात जनतेला मिळणाऱ्या सोई, सुविधा यांवर बोलावे, असे टीकाकारांचे म्हणने.