
येरवडा (Yerwada), आर्थर रोड (Arthur Road), भायखळा (Byculla), कल्याण (Kalyan) आणि ठाणे ( Thane), कारागृहात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामळे आता यापुढे कारागृहातील कोणताही कैदी अथवा इतर कर्मचारी कारागृहात आत किंवा बाहेर ये जा करणार नाही. राज्यात असलेला कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कारागृहातील कैदी आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक वस्तू आणि धान्यसाठा कारागृहात करुन ठेवण्यात आल्याचे कारागृह प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू संकट नियंणासाठी देशभरात काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने 7 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कारावासाची शिक्षेची तरतूद असलेल्या कैद्यांना जामीनावर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्यातील विविध कारागृहात असलेल्या सुमारे 2 हजार 856 बंदिवानांची तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच, विविध कारागृहांतील 8 हजार बंदिवानांना टप्यटप्याने सोडले जाणार होते. (हेही वाचा,Bhima Koregaon Case: आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून )
देशभरात वाढत असलेला कोरोना व्हायरसचा कहर विचारात घेऊन कारागृहातही त्याचा प्रभाव वाढू नये. यासाठी कारागृहातील बंदिवानांना सोडण्यात यावे यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कारागृहात संख्येपेक्षा अधिक असलेल्या कैद्यांना तातडीने पॅरोल आणि तात्पुरत्या जामीनावर सोडावे असे आदेश न्यायालयाने दिले होते.