CM Uddhav Thackeray Live: कोरोनाला रोखण्यासाठी फीवर क्लिनिक्स ते सुसज्ज हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारचा मास्टर प्लॅन; जाणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबूक लाईव्ह मधील महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधला. आजच्या लाईव्ह मधून मुख्यमंत्र्यांनी तीन महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आज राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधला. आजच्या लाईव्ह मधून मुख्यमंत्र्यांनी तीन महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. यापैकी सर्वात प्रथम म्हणजे नागरिकांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले, शक्य असल्यास घरगुती रुमालाचा मास्क बनवून सुद्धा वापरू शकता असे उद्धव यांनी म्हंटले आहे, तर दुसरा महत्वाचा मुद्धा म्हणजेच आरोग्य विभागाची चार प्रकारात विभागणी करण्यात आल्याचे उद्धव यांनी सांगितले आहे. यापुढे कोरोनाची सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणे असणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलची स्थापना करण्यात येणार असल्याचे उद्धव यांनी म्हंटले आहे तर साधारण ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिकची (Fever Clinic) स्थापना करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे, तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राज्यातील निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुढाकार घेऊन कोरोनावरील उपचारात राज्य सरकारला मदत करावी अशी विनंती केली आहे. यासाठी covidyoddha@gmail.com या आयडीवर अर्ज करता येणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या लाईव्ह मधील अन्य महत्वाचे मुद्दे जाणून घ्या.
- महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मत्रमंडळाची बैठक पार पडली. यावरून सरकारी कर्मचारी हा लढा किती गांभीर्याने लढत आहेत याचा अंदाज येतो. त्यासाठी उद्धव यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
-राज्यात अन्नछत्राच्या माध्यमातून पाच ते साडेपाच लाख गरजूंना सकाळचा नाष्टा आणि दोन वेळचं जेवण अशा सुविधा पुरवल्या जात आहेत.
- केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळत आहे, राज्यातील गरजूंना अन्नधान्य पुरवण्यासाठी केंद्र सरकारने तांदूळ पुरवले आहेत ज्यांचा पुरवठा राज्यात ठिकठिकाणी सुरु करण्यात आला आहे.
- राज्यात सध्या केवळ लाभाथी वर्गातील रेशनकार्ड धारकांना धान्य पुरवण्यात येत आहे मात्र लवकरच मध्यम वर्ग म्हणजे केशरी शिधापत्रिका धारकांसाठी सवलतीच्या दरात धान्य पुरवण्यात येणार आहे, याबाबत महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
- कोरोनाचे आकडे वाढत आहेत मात्र त्याचे कारण हे वाढलेल्या कोरोना चाचण्या आहेत. कोरोना चाचणीची संख्या वाढवल्याने रुग्णांचे आकडे वाढत आहेत. मुंबई आणि पुणे येथे कोरोनाची चाचणी घरोघरी जाऊन केल्या जात आहेत. जास्तीतजास्त चाचण्या केल्या जात आहेत, टेस्ट किट्स विकत घेतले जात आहेत.
- राज्यातील नागरिकांनी मास्क वापरण्याच्या बाबत दक्षता बाळगावी. यासाठी घरगुती मास्क देखील वापरू शकता, फक्त एकमेकांचे कॉमन मास्क वापरू नका, त्यांना स्वच्छ धूत जा, शक्य असल्यास काळजीपूर्वक हे वापरलेले मास्क जाळून टाका.
- राज्यातील निवृत्त वैद्यकीय कर्मचारी, सैन्य दलातील मेडिकल विभागाचा अनुभव असणारे कर्मचारी,परिचारिका, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती यांना जर का या संकटकाळात मदत करण्याची इच्छा पुढाकार घ्यावा. यासाठी covidyoddha@gmail.com या आयडीवर कळवावे असे सांगण्यात आले आहे.
- राज्यात यापुढे सर्दी, ताप,खोकला अशी लक्षणे आढळल्यास यापुढे फिव्हर क्लिनिक मध्ये उपचार केले जातील.
- कोरोनाची कमी आणि माईल्ड लक्षणे असल्यास त्यासाठी वेगवेगळे हॉस्पिटल असणार आहे.
- कोरोनाची तीव्र लक्षणे व सोबतच मधुमेह,रक्तदाब असे आजार असल्यास अशा रुग्णांसाठी वेगळे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.
दरम्यान,कोरोनाचे युद्ध आपण जिंकणारच आहोत मात्र हे सर्व उरकल्यावर राज्यातील आर्थिक संकटाला पळायला लढा द्यायचा आहे त्यासाठी सर्वांनी तयार राहावे असे आवाहन उद्धव ठकरे यांनी केले आहे. चीन मधील वुहान शहरात आता सुधारलेली परिस्थिती पाहता आपणही या संकटाला उलथवून लावू हे निश्चित आहे असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, महाराष्ट्रात कोरोनाचे सद्य घडीला 1078 रुग्ण आहेत, यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, याठिकाणी सार्वधिक रुग्ण आढळले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2020 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

