संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले जेष्ठ पत्रकार दिून रणदिवे यांच्या पत्नी सविताताई (Savitatai Ranadive) यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शोक व्यक्त केला आहे. सविता रणदिवे यांचे आज दादर येथील निवासस्थानी निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या. निखळ पत्रकारितेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या दिनू रणदिवे यांच्या मागे सविताताई तितक्याच खंबीरपणे उभ्या होत्या. शिक्षिका म्हणून अनेकांना घडविणाऱ्या सविताताईंनी पतीच्या ध्येयवादी पत्रकारितेसाठी तितक्याच समर्थपणे साथ दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
चिंचपोकळी येथील प्रेमजी देवजी कन्या विद्यालयात गुजराती भाषेच्या शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले होते. शिक्षक संघटनेच्या त्या कार्यकर्त्या होत्या. शिक्षक संघटनेचे अर्ध्वयू तात्या सुळे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांचा सहभाग होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी 1956 साली शिवाजी पार्क येथे सर्वभाषिकांच्या झालेल्या पहिल्या परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. गुजराती भाषिकांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या भाषणात मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग असावा, अशी आग्रही भूमिका मांडली होती. हे देखील वाचा- मी विधान परिषदेची उमेदवारी मागितलीचं नव्हती, म्हणून माझ्या नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही - विनोद तावडे
उद्धव ठाकरे यांचे ट्वीट-
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविता ताई यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. एका व्रतस्थाची ही सावली हरपली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2020
अजित पवार यांचे ट्वीट-
संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तसंच ज्येष्ठ पत्रकार दिनु रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनानं सामाजिक, पुरोगामी चळवळीतील आदर्श व्यक्तिमत्व पडद्याआड गेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 16, 2020
महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असताना सविता रणदिवे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहली आहे.