Chhath Puja 2020: मुंबई महापालिकेने समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी घातल्यानंतर नागरिकांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
छठ पूजा (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला (Chhath Puja 2020) घातली आहे. छठ पूजेसाठी समुद्रावर होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही, अशी शंका मुंबई महापालिकेला आहे. दरवर्षी जुहू बीचवर छठ पूजेसाठी हजारो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. परंतु, यावर्षी सर्वत्र कोरोनाचे संकट असल्यामुळे मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे नागरिकांनी समर्थन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी सर्वजण घरीच छठ पूजा साजरी करणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांत प्रामुख्याने साजरा होणारा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. जुहू बीचवर दरवर्षी छठ पूजेसाठी हजारो उत्तर भारतीयांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. छट पूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक समुद्रकिनारी, तलाव, नदी किनारी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही अटी घातल्या आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निर्णयाबाबत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना एका महिलेने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, छठ पूजानिमित्त दरवर्षी जुहू बीचवर मोठी गर्दी पाहायला मिळते. परंतु, कोरोनामुळे यंदाची छठ पूजा आम्ही घरीच साजरी करणार आहोत. तसेच आम्ही सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतो, असेही त्या म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- Chhath Puja in Pune and Pimpri Chinchwad: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस मनाई, महापालिकेचा निर्णय

एएनआयचे ट्वीट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक समाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सण लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली साजरी करावे लागले आहेत. सध्या मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. परंतु, अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही. यामुळे नागरिकांनी नेहमी तोंडावर मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन गरजेचे आहे.