मुंबई: मध्य रेल्वेचा उद्याचा मेगाब्लॉक रद्द; मात्र 'जनता कर्फ्यू' मुळे 60% लोकल सेवा सुरु राहणार
Mumbai Railway High Alert (Photo credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्या म्हणजेच 22 मार्च ला 'जनता कर्फ्यू' (Janta Curfew) घोषित केला आहे. या मोहिमेला जास्तीत जास्त लोकांनी पाठिंबा दर्शवून घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधानाच्या या मोहिमेत संपूर्ण देश सहभागी व्हावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणा जोरात कामाला लागल्या आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने (Central Railway) उद्याचा मेगाब्लॉक रद्द केलेला आहे. त्याचबरोबर मेगाब्लॉक जरी रद्द करण्यात आला असला तरी जनता कर्फ्यू मुळे 22 मार्च ला केवळ 60% लोकल सेवा सुरु राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईची लाईफलाईन समजली लोकल रेल्वे ही सदैव मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असते. मात्र कोरोना व्हायरसरच्या काळ्या सावलीमुळे या लोकल सेवेलाही ब्रेक लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गर्दीत पसरणा-या या आजारामुळे मुंबईतील सर्वाधिक गर्दी असणा-या लोकल सेवेवर विशेष काळजी घेण्यात आली आहे. या दृष्टीने मध्य रेल्वेने उद्याचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. मात्र नागरिकांची गरज पाहून केवळ 60% लोकल सेवा सुरु राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्य रेल्वेचे ट्विट:

हेदेखील वाचा- Janata Curfew: कोरोना व्हायरसमुळे रेल्वेने रविवारी रद्द केल्या 3,700 पेक्षा अधिक गाड्या

त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या आदेशानुसार 22 मार्च रोजी, देशभरात चालणाऱ्या 2400 पॅसेंजर गाड्या आणि 1300 मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांसाठी केलेले बुकिंग रद्द मानले जाईल. त्यांचे सर्व पैसे प्रवाशांना परत केले जातील. मात्र, रविवारी सकाळी सात वाजता सुटणार्‍या प्रवासी गाड्यांना इच्छित स्थळी पोहचण्याची परवानगी देण्यात येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे लाखो लोक त्यांच्या घरातच राहतील आणि करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यात याची मदत होईल.

22 मार्च, रविवारी सकाळी 7 वाजता जनता कर्फ्यू सुरु होईल. यामुळे 3,700 रेल्वे गाड्या, दिल्ली मेट्रो आणि एक हजार उड्डाणे रद्द करण्यात येणार आहेत. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट्सही बंद राहतील.